Abhishek Verma: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात सातत्याने पक्षप्रवेश सुरु आहेत. ठाकरे गटातून अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता एका बड्या उद्योगपतीने धनुष्यबाण हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योजक आणि आर्म्स डीलर अभिषेक वर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अभिषेक वर्मा यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यावर यापूर्वी हेलिकॉप्टर घोटाळा, पाणबुडी खरेदी घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप होते. पण न्यायालयाने त्यांना २०१५ आणि २०१७ मध्ये सर्व आरोपातून मुक्त केले.
नवी दिल्ली येथील उद्योगपती अभिषेक वर्मा यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात प्रवेश केला. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा देखील उपस्थित होते. वर्मा यांना पक्षाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक (निवडणुका आणि आघाडी) म्हणून पक्षात सामील करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी एक्स पोस्टवरुन ही माहिती दिली.
नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध उद्योगपती अभिषेक वर्मा यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांची पत्नी व सुपुत्र देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते. यावेळी त्यांची नियुक्ती पक्षाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक (निवडणूक आणि युती) या पदी करण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेनेचे आसाम राज्यप्रमुख आणि नॉर्थ ईस्ट प्रभारी परमिंदरसिंह मनचंदा हेदेखील उपस्थित होते, असं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सीबीआयने १३ वर्षांपूर्वी आर्म्स डीलर अभिषेक वर्मा आणि त्याच्या रोमानियन पत्नीला भारत सरकारच्या काळ्या यादीतून काढून टाकण्याच्या बदल्यात स्विस शस्त्रास्त्र कंपनीकडून पैसे घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तपास यंत्रणेला समाधानकारक उत्तरे न दिल्याने सीबीआयने वर्मा आणि त्यांची पत्नी एन्सिया निएस्कू यांना अटक केली होती. त्याआधी सीबीआयने वर्मा यांना कथित बनावट पासपोर्ट आणि नेव्हल वॉर रूममधून गोपनीय व्यावसायिक माहिती परदेशी कंपन्यांना लीक केल्याप्रकरणी अटक केली होती.
न्यू यॉर्कमधील गॅंटन कंपनीचे अध्यक्ष अॅलन यांनी जानेवारी ते मार्च २०१२ दरम्यान भारत सरकारला पत्रे लिहिली होती, ज्यात वर्मा यांच्याशी संबंधित बेकायदेशीर आणि कथित भ्रष्ट पद्धतींची कथित माहिती दिली होती.