राजेश जोशीची न्यायालयीन कोठडीत रवानगीनागपूर : गुंतवणूकदारांना कोट्यवधीने गंडा घातल्याप्रकरणी रविराज इन्व्हेस्टमेंट अँड स्ट्रॅटेजिस कंपनीची कोट्यवधीची मालमत्ता गोठवण्यात आल्याची माहिती बुधवारी सरकार पक्षाकडून एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. मुळे यांच्या न्यायालयात देण्यात आली. दरम्यान या कंपनीचा प्रमुख आरोपी राजेश सुरेश जोशी याच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडसाठी करण्यात आलेली विनंती न्यायालयाने नामंजूर केली. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी करण्यात आली. विवेकानंदनगर येथील विजय वामन मराठे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात ८ जुलै २०१४ रोजी ठगबाज राजेश जोशी, कंपनीचे इतर नातेवाईक संचालक आणि एजंट यांच्याविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, १२० ब आणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा १९९९च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जोशीला ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे पथकाने त्याचा दोन वेळा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपताच जोशी याला आज पुन्हा न्यायालयात हजर करून वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली होती. फसवणुकीचा आकडा ३ कोटींवरगुन्हा दाखल होऊन अटकेपर्यंत ३३ गुंतवणूकदारांनी १ कोटी ९२ लाख ४० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या. तक्रारींमध्ये वाढ झाली. एकूण ५८ गुंतवणूकदारांनी आपले बयाण नोंदवले. त्यानुसार फसवणुकीचा आकडा ३ कोटी १८ लाख ४० हजार रुपये झालेला आहे. तक्रारींचा ओघ अद्यापही सुरूच असल्याचेही सरकार पक्षाकडून न्यायालयाला सांगण्यात आले. मालमत्ता गोठवल्याआरोपी राजेश जोशी याने गुंतवणूकदारांच्या रकमेतून खरेदी केलेला रामदासपेठच्या रचना सोसायटीतील फ्लॅट, सोनेगाव येथील मोकळा भूखंड, वर्धा मार्गावरील स्वत:च्या कार्यालयासाठी विकत घेतलेली जागा, काटोल तालुक्यातील मौजा कामठी, वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील मेठहिरजी आणि कुऱ्हा रिठ येथील शेतजमिनी, नागपूर जिल्ह्यातील पांजरी, शहरातील वंजारीनगर आणि वणीच्या एमआयडीसीतील भूखंड, अशा कोट्यवधीच्या मालमत्ता गोठवण्यात आल्या आहेत. या शिवाय तपासात रविराज मायनिंग या नावाने चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या गोविंदनगर येथे सुरू असलेली डोलामाईटची खाण आढळून आली आहे. ही खाण कराराने घेण्यात आलेली आहे. आरोपीने मध्य प्रदेशातही मालमत्ता खरेदी केल्या असून त्या जप्त करावयाच्या आहेत, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. स्वत:च्या नावे वटवले ५० लाखआरोपी राजेश जोशी याने सप्टेंबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत कंपनीच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यातून स्वत:च्या नावाने ५० लाख रुपये वटविले आहेत. या शिवाय बँक आॅफ महाराष्ट्रच्या खात्यातूनही मोठ्या रकमा स्वत:च्या नावे वटविल्या आहेत. या रकमांचे आरोपीने काय केले, याबाबत आरोपी काहीही सांगत नसून त्याची कसून विचारपूस करावयाची आहे. या शिवाय त्याने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे ३४ लाख रुपये वळते केले आहेत. ही रक्कम जप्त करावयाची आहे. कंपनीच्या बँक आॅफ महाराष्ट्रमधील खात्यातून मोठमोठ्या रकमांचे धनादेश इतरत्र ‘क्लियर’ झालेले आहेत. आरोपीने या रकमा कुठे वळत्या केल्या याबाबत तपास करणे आहे, असेही न्यायालयाला सांगण्यात आले होते. न्यायालयात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. विश्वास देशमुख यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी एन. पी. पवार हे आहेत.
‘रविराज’ची कोट्यवधीची मालमत्ता गोठवली
By admin | Updated: August 21, 2014 01:20 IST