मुंबई : प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपा-शिवसेनेला सत्ता मिळाल्याने सरकारमधील मंत्री आणि नेते मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वागत आहेत. म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. शेतकऱ्यांपेक्षा, वादग्रस्त विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यांनाच समुपदेशनाची जास्त गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे एकीकडे म्हणतात की, शेतकऱ्यांकडे मोबाइलचे बिल भरण्यासाठी पैसे असतात मग ते विजेचे बिज का भरू शकत नाहीत? दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी शेतकऱ्यांनी आता सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये असे सांगतात. हेच नितीन गडकरी शेतकऱ्यांना शेतीसाठी मानवी मूत्राचा वापर करा, त्यामुळे शेतीतून भरघोस उत्पादन मिळते असा सल्ला देतात; आणि त्यांचीच री ओढत कृषिमंत्री एकनाथ खडसे मल्टिप्लेक्समधील मलमूत्राचे संकलन करून शेतीसाठी कसे वापरता येईल यासंदर्भात सरकार प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त करतात. अशा प्रकारे भाजपा सरकारमधील नेतेमंडळी नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.
मंत्र्यांनाच समुपदेशनाची गरज
By admin | Updated: May 15, 2015 02:20 IST