Coronavirus: महामारीला तोंड देण्यासाठी भगवान महावीरांची शिकवण मोलाची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 06:14 AM2020-04-12T06:14:54+5:302020-04-12T06:15:50+5:30

संडे अँकर । लढाई ‘कोविड-१९’शी। संयम, अपरिग्रह या दोन तत्त्वांनी होईल वैश्विक संकटावर मात

Coronavirus: Lord Mahavir's teaching is valuable in dealing with pestilence | Coronavirus: महामारीला तोंड देण्यासाठी भगवान महावीरांची शिकवण मोलाची

Coronavirus: महामारीला तोंड देण्यासाठी भगवान महावीरांची शिकवण मोलाची

googlenewsNext

संजय सोनवणी

आज श्रेष्ठ मानवी मूल्यांची उद्घोषणा करणाऱ्या भगवान महावीरांची जयंती नुकतीच जगभरात साजरी झाली. अखिल विश्वाला शांतता व अहिंसेसह उदात्त जीवनमूल्यांची शिकवण देणाºया भगवान महावीरांनी जगाला अभिनव तत्त्वज्ञानही दिले जे सार्वकालिक आहे. सारे जग याक्षणी कोरोना विषाणूच्या महामारीच्या संकटात सापडलेले असताना, माणसा-माणसांत व राष्ट्रा-राष्ट्रांत एकीकडे संशयाचे वातावरण वाढत असताना दुसरीकडे प्राणभयाने जागतिक समाज-मानसिकता विस्कळीत होऊ लागली आहे. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याचा थांग कोणाला लागेनासा झालेला आहे. काही राष्ट्रीय नेतृत्वेही संभ्रमित झालेली आहेत, परिस्थितीसमोर हार मानू लागली आहेत. साºया जगाचे चक्र ठप्प झाल्यासारखे झाले आहे. जवळपास सारे जग आपापल्या घरात बंदिस्त झाले आहे. मानसिक कुंठांची शिकार होऊ लागले आहे. अशा स्थितीत भगवान महावीर आपल्यासमोर आजही पथदर्शक होऊन दिलासा देत आहेत.

इसवी सन पूर्व ५९९ मध्ये भगवान महावीरांचा जन्म झाला. त्यांचे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे धर्म-सिद्धांत सर्वपरिचित आहेतच. पण संयम हा त्यांनी सांगितलेला सर्वांत महत्त्वाचा सद्गुण होय. कोणत्याही बिकट स्थितीवर मात करायची असेल, तर संयम गुण हा अंगी बाणवावा लागतो, असे महावीर सांगत असत. संयम प्रत्येक व्यक्तीला आहे त्या स्थितीकडे पाहायची व्यापक दृष्टी देतो. सहनशक्ती हे संयमाचेच उपफल आहे. संयमामुळे मनोवत्ती छोट्या-मोठ्या कारणाने उत्तेजित होत नाहीत, उलट आहे त्या स्थितीतून मार्ग काढायची शक्ती प्राप्त होते. संयमी माणसांच्या मनोवृत्तीही सुदृढ असतात आणि अशा संयमी लोकांचा समुच्चय कोणत्याही संकटावर भारी पडतो. आज आपण पाहिले तर भारतीय समाज एका वेगळ्या मानसिक संक्रमणातून चालला आहे. भय, अनिश्चितता, अस्थिरता आणि परस्परांबाबतच्या संशयाने विघातक प्रवृत्ती जोपासत सामाजिक दुही निर्माण करण्याच्या कार्यात नकळत सहभागी झाला आहे आणि आपण काही चुकीचे करत आहोत याचे भान नाही. स्वत:ला घरात काही दिवस बंदिस्त राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, तर त्या बंदिस्ततेतही आपल्याला करण्यासारखे सकारात्मक असे पुष्कळ काही आहे याचे भान गमावून तो संयम सोडून रस्त्यांवर धाव घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक जीवन त्यामुळे धोक्यात येईल, याचे भानही त्यामुळे गमावले जात आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे आता या एकांतवासाच्या समस्येने अस्वस्थ झालेल्या मनोरुग्णांच्या रांगा लागत आहेत. पण, त्यांनी संयम ठेवला, आत्मचिंतन केले, स्वत:च्या आत उतरून स्वत:चा शोध घेतला तर स्वत:बाबतचीच अनेक रहस्ये त्यांना उलगडू शकतात. मग मानसिक विकारांचा स्पर्शही होणार नाही. उलट स्वत:ला जिंकणारा, म्हणजेच जिन, होण्याकडे, आदर्श मानव होण्याकडे त्याची वाटचाल सुरू होईल, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.

आज शहरी भागांतील लाखो मजूर हाल-अपेष्टा सहन करत शेकडो मैल चालत आपल्या गांवी परतत आहेत. गरीब-बेघरांना दोन काय, एक वेळही खायला मिळत नाहीय. डॉक्टर्स, परिचारिकांना सुरक्षेसाठी लागणाºया साधनांची कमतरता आहे. सरकार काय करायचे ते प्रयत्न करतेच आहे; पण प्रत्येक व्यक्तीचीही यात सहायता करण्याची जबाबदारी आहे. भगवान महावीरांनी अपरिग्रहाचे महान तत्त्व मानवजातीला दिले. अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणे. संग्रह मानवी दु:खाचे
कारण बनतो.
आपल्याकडील जे अतिरिक्त आहे त्याचे समाजाला वाटप करणे म्हणजे अपरिग्रह. आज प्रत्येकाला हे तत्व आचरणात आणण्याची संधी आहे. आपल्या भवतालात मनुष्यच नव्हे तर इतर प्राणिसृष्टीचीही उपासमार होणार नाही, याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान एखाद्या सागरासारखे आहे. पण, आजच्या या आपत्तीत महावीरांची ही दोन तत्त्वे जरी अंमलात आणली तर आपण कोरोनाच्या संकटावर मात करू शकू, याचा विश्वास वाटतो.


‘कोरोना’च्या महामारीमुळे संपूर्ण जगासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. मानवापुढील या संकटावर मात करायची असेल, तर भगवान महावीर यांनी सांगितलेल्या संयम आणि अपरिग्रह या तत्त्वांची नितांत आवश्यकता आहे. भगवान महावीर यांची शिकवण आजच्या संकटकाळी जगाला पथदर्शी अशीच आहे.

Web Title: Coronavirus: Lord Mahavir's teaching is valuable in dealing with pestilence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.