मुंबई : मुंबई, ठाण्यातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी मुंबईत ३ हजार ५१२ नवे कोरोनाग्रस्त आढळले. तर ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्येतही मंगळवारी धक्कादायक वाढ झाली असून, हा आकडा २ हजार ५३८वर पोहोचला. राज्यात दिवसभरात २८ हजार ६९९ रुग्ण आणि १३२ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ लाख ३३ हजार २६ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ५८९ झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ३० हजार ६४१ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत मंगळवारी ३,५१२ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून ८ मृत्यू झाले.
एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ६९ हजार ४२६वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११ हजार ६०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ९० दिवस आहे. मुंबईत सध्या २७ हजार ६७२ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण आढळलेल्या ३८ चाळी व झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ३६३ इमारती रुग्ण आढळल्याने सील करण्यात आल्या आहेत.