कार्यकर्त्यांंंचा आरोप : समीक्षा बैठकीत व्यक्त केला रोष नागपूर : नागपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांंंनी नेत्यांच्या डोक्यावर फोडले. आपसातील मतभेदामुळे नेत्यांनी जोमाने कार्य केले नाही. सच्चा कार्यकर्त्यांंंची कदर करण्यात आली नाही. यामुळे काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले, असे मत नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या समीक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आले. ही बैठक रविवारी राणीकोठी येथे पार पडली.बैठकीत माजी खासदार विलास मुत्तेमवार, रोहयो मंत्री नितीन राऊत, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी खासदार गेव्हबाबू आवारी, आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार एस. क्यू. जमा, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, शेख हुसेन, माजी आमदार अशोक धवड, ज्येष्ठ नेते विनोद गुडधे-पाटील आदी नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांंंना सर्वप्रथम बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी आपापल्या पद्धतीने पराभवाची समीक्षा करून विविध महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. कार्यकर्त्यांंंनी उपस्थित केलेल्या भावना नेत्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडणार्या होत्या. नेत्यांनी शेवटी मनोगत व्यक्त केले.मुत्तेमवार यांनी व्यथित मनाने भावनांना वाट मोकळी करून दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची यापूर्वीही पिछेहाट झाली होती. परंतु, विदर्भातील नागरिकांनी काँग्रेसचा हात सोडला नव्हता. यावेळी कुणी विरोधात काम केले किंवा कुणी कामच केले नसल्याने हरलो नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार ताकदवान होता. आरएसएस सारखी मोठी संघटना त्याच्या पाठीशी होती. आरएसएस कार्यकर्ते घरोघरी जाऊन परिवर्तन आणण्याचा प्रचार करीत होते. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट १५ दिवसांपूर्वी जाहीर केले. यामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. प्रामाणिकपणे कार्य करणे हाच माझा दोष असून नागरिकांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या उमेदवाराला निवडून दिले आहे, असे मुत्तेमवार यांनी सांगितले.काँग्रेसने नागपूरचा विकास केला, पण नागरिकांनी या शहराला भकास करणार्यांना सत्तेवर बसविले. आपण पूर्ण क्षमतेने बाजू मांडू शकलो नाही. ‘अपने दिलभी नही मिले और हातभी’, असे सूचक वक्तव्य नितीन राऊत यांनी केले.चतुर्वेदी यांनी घरभेद्यांना ओळखण्याचे व विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले, तर अहमद यांनी भूतकाळातील चुका सुधारून पुढे जाण्यास सांगितले.(प्रतिनिधी)
गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव
By admin | Updated: June 9, 2014 01:24 IST