“शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 07:00 PM2024-04-25T19:00:49+5:302024-04-25T19:05:15+5:30
CM Eknath Shinde News: निवडणुका येतात, जातात पण आमचे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
![cm eknath shinde reaction over ncp sharad pawar group manifesto for lok sabha election 2024 | “शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल cm eknath shinde reaction over ncp sharad pawar group manifesto for lok sabha election 2024 | “शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/eknath-shinde-and-sharad-pawar_2024041219152.jpg)
“शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल
CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. भाजपा आणि काँग्रेस जाहीरनाम्यावरून एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला शपथपत्र असे नाव दिले आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सवाल केला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींवर काम करण्यासाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाईल. सरकारचा राजकीय हस्तक्षेप नसेल. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य जीएसटी केला जाईल, असे शरद पवारांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथपत्रावरून टीका केली. शरद पवार कृषीमंत्री होते, चार वेळा मुख्यमंत्री होते. मग त्यांच्यावर अशी वेळ का आली? अडीच वर्षे त्यांच्याकडे सरकार होते. गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना आम्ही मोबदला दिला. १५ हजार कोटी अतिवृष्टी आणि गारपीटीच्या काळात दिले. एक रुपयात पीक विमा योजना दिली. सर्वांत जास्त शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार सरकार आमचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
निवडणुका येतात, जातात पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
जिथे दुष्काळ आहे, जिथे अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे नुकसान झाले आहे, तिथे सर्व विभागीय आयुक्त, कलेक्टर, मुख्य सचिव यांना सूचना दिलेल्या आहेत. निवडणुका येतात, जातात पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनामे होतील, त्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळेल, मोबदला मिळेल, जिथे पाणी टंचाई आहे, तिथे टँकरने पाणी मिळेल, चारा मिळेल, कुठेही काहीही कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसने माफीनामा जाहीर केला पाहिजे. जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकारी नाही. त्यांनी ५०-६० वर्षे देशाला खड्ड्यात टाकले. या देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले. देशाला पुढे न्यायचे असेल, महासत्तेकडे न्यायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.