यदु जोशी, मुंबईराज्य मंत्रिमंडळाची बैठक यापुढे ‘सह्याद्री’ऐवजी फक्त मंत्रालयातच घेतली जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मात्र विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधीच त्यासाठी अपवाद राहील. मंत्रालयाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. मंत्रिमंडळाची बैठक कशीतरी उरकण्याऐवजी संबंधित मंत्र्यांना आपली भूमिका पूर्णपणे मांडू दिली पाहिजे. त्यासाठी बैठक थोडी जास्त वेळ चालली तरी चालेल, असा फडणवीस यांचा आग्रह आहे. केंद्रातील पीएमओच्या धर्तीवर सीएमओची स्थापना करणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आधीच दिलेले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारऐवजी दर मंगळवारी असली, तरी या वेळी ती बुधवारी (दि. ५) होणार आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार विभागांचे सादरीकरण झाले होते. उर्वरित काही विभागांचे सादरीकरण बुधवारच्या बैठकीत होणार आहे. कामाचे वेळापत्रक आणि काटेकोरपणा पाळून अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या समस्या, कामगिरी आणि पुढील नियोजन याबाबत गुणवत्तापूर्ण चर्चा केली पाहिजे, असे फडणवीस यांनी बजावल्याचे समजते.
मंत्रिमंडळाची बैठक यापुढे मंत्रालयातच
By admin | Updated: November 4, 2014 03:22 IST