BJP Replied Rahul Gandhi: 'मतचोरी' आणि बिहारमधील मतदार याद्यांविरुद्धची लढाई आता संसदेच्या सभागृहांतून रस्त्यावर आली आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या पक्षाचे नेते व खासदार या मोर्चात उत्स्फूर्तपणे उतरले. विरोधी पक्षाच्या जवळपास ३०० खासदारांसह नेत्यांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चाच्या माध्यमातून कूच केली. हातात मोठमोठे बॅनर्स आणि मुखात आक्रमक घोषणा यामुळे राजधानीत संसद परिसर दुमदुमला. मोर्चेकऱ्यांचे टार्गेट होते निवडणूक आयोगाचे कार्यालय. परंतु, पोलिसांनी ट्रान्सपोर्ट भवनजवळच मोर्चा अडवला आणि नेत्यांना ताब्यात घेतले. यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यातच भाजपानेराहुल गांधींवर टीका केली.
राहुल गांधी म्हणजे खोट्या, फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच आहे, हे आता वारंवार सिद्ध होते आहे. वर्षानुवर्षे निवडणुका हरल्यानंतर असे फेक नॅरेटीव्हचा आधार घेत थयथयाट करायचा व त्यालाच सत्य मानत जनतेच्या माथी मारायचे हीच गांधी घराण्याची स्वत:ला सर्वापेक्षा वेगळे व श्रेष्ठ समजणारी हुकूमशाही मानसिकता. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, असे सांगत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला.
राहुल गांधीच्या फेक न्यूजचे टप्पे
एक म्हणजे याआधी महाराष्ट्रात कधी ७० लाख तर कधी १ कोटी मतदान झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला. या कथित मतचोरीचे आरोप मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फेटाळून लावले. दुसरे म्हणजे भारतीय लष्कराबद्दल च्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाकडून खडे बोल. तिसरे म्हणजे राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली. चौथे म्हणजे सावरकर, हिंडेनबर्ग. रा स्व संघ यावर नुसतेच आरोप न्यायालयात काहीच सिद्ध करता आले नाही. राहुल गांधीच्या फेक न्यूजचे टप्पे - हिमाचल, तेलंगणा काँग्रेस जिंकली की सर्व उत्तम, पण पराभव झाला की, काही तरी सबब शोधायची, त्यांची रितसर तक्रार करायची नाही, न्यायालयात टिकणारे कसलेही पुरावे द्यायचे नाही, मग फेक न्यूज. म्हणूनच, राहुल गांधी फेक न्यूजचे बादशहाच, आणि त्याला सतत मुजरे करणारे काँग्रेसी हुजरे!, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांची ही निदर्शने म्हणजे देशात अराजक व अस्थिरता पसरविण्याचा डाव असल्याचा आरोप भाजप नेते व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला. भाजपा मुख्यालयात बोलताना त्यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळून लावले. तर, केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 'इंडिया' आघाडी लोकशाहीला बदनाम करत असल्याचे सोशल मीडियावर नमूद केले.