महापालिकेचे दुर्लक्ष : पुतळ्याची दुरवस्था नागपूर : देशाचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या महाराजबाग चौकातील भव्य पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या सुंदर परिसराची महापालिकेच्या दुर्लक्षामुळे वाताहत झाली आहे. इतकेच नव्हे तर हा परिसर असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहराचे महापौर असताना त्यांच्या कार्यकाळात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या भव्य पुतळा महाराजबाग चौकात उभारण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पुतळ्याच्या परिसरात सुंदर उद्यान निर्माण करण्यात आले होते. त्यात विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली होती. लाल रंगाच्या दगडांवर नक्षीदार काम या परिसरात करण्यात आले होते. बसण्यासाठी सुंदर बाके होती. संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था करण्यात आली होती. पाण्याचे कारंजे लावण्यात आले होते. शहरातील अतिशय सुंदर अशा परिसरापैकी हे एक स्थळ होते. कृषी महाविद्यालयाने ही जागा महापालिकेला दिली होती. त्यानंतर त्यांनी पुतळा व इतर कामे केली. परंतु सध्या येथील बाग पूर्णत: नष्ट झाली आहे. फुलझाडांऐवजी सर्वत्र गवत उगवले आहे. कोरीव काम करण्यात आलेल्या दगांमध्ये झाडे उगवली आहेत. बसण्याच्या बाकांच्या जागेवर कचराघर बनले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून याकडे महापालिकेने लक्ष न दिल्याने शहरातील अतिशय सुंदर असलेले हे ठिकाण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. (प्रतिनिधी)
भाऊसाहेब आम्ही कृतघ्न आहोत...
By admin | Updated: December 2, 2014 00:40 IST