पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची थकीत रक्कम येत्या दोन आठवड्यांत न देणाऱ्या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन शासनाने दिल्यामुळे स्वाभिमानी संघटनेने आपले बेमुदत ठिय्या आंदोलन आंदोलन सोमवारी मागे घेतले़ सायंकाळी उशिरापर्यंत राजू शेट्टी यांची साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांच्या माध्यमातून शासनाशी चर्चा सुरू होती. ज्या साखर कारखान्यांकडे २०१४-१५च्या हंगामातील शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी एफआरपीची थकबाकी आहे व ज्याची सुनावणी झाली आहे, त्यांनी दोन आठवड्यांच्या आता पैसे अदा करा, असे आदेश शासनाच्या वतीने साखर आयुक्तांनी दिले आहेत. तर, अन्य कारखान्यांनी तीन आठवड्यांत सर्व कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी शासनाला मुदत देऊन बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले.तत्पूर्वी, देशात व राज्यात सत्ताबदल करून भाजपाला सत्तेवर आणल्याची मोठी शिक्षा सध्या शेतकरी भोगत असल्याच्या तीव्र भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाच्या वेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे एफआरपी नुसार मिळणारे हक्काचे तब्बल ३ हजार ८०० कोटी रुपये राज्यातील साखर कारखान्यांनी थकविले आहेत. हे पैसे नाकारणाऱ्या साखर कारखान्यांची संचलाक मंडळे बरखास्त करुन त्यांना तुरुंगात डांबावे, अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने केली. (प्रतिनिधी)
‘त्या’ साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त
By admin | Updated: June 23, 2015 02:22 IST