जनमंचची मागणी : लढा विदर्भाचानागपूर : तेलंगणा राज्य निर्मितीमुळे विदर्भाची अपेक्षा वाढली आहे तर भाजपा केंद्रात सत्तेत आल्याने विदर्भवासीयांचा आत्मविश्वासही वाढला आहे. कारण भाजपाने भुवनेश्वर येथे विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव केला होता. मात्र सत्ता आल्यानंतर भाजप नेत्यांची भाषा बदलत आहे. शिवसेनेला समोर करून मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. नेत्यांचा डाव जनमंचने ओळखला असून, विदर्भाच्या बाबतीत केंद्र सरकारने विधानसभेपूर्वी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जनमंचद्वारे करण्यात आली आहे. सरकारवर दबाव वाढविण्यासाठी जनमंचतर्फे विदर्भभर जनजागृती अभियान राबविणार असल्याचा इशारा जनमंचचे मार्गदर्शक चंद्रकांत वानखेडे यांनी पत्रपरिषदेत दिला. विदर्भाची मागणी १०० वर्षापूर्वीची आहे. जनमंचद्वारे घेण्यात आलेल्या सार्वमतात विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी प्रचंड बहुमताने कौल मिळाला. निवडणुकीपूर्वी विदर्भातील सर्व उमेदवारांकडून लेखी हमीपत्रही घेतले होते. मात्र नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ राज्यासाठी दोनतृतीयांश बहुमताची गरज असल्याचे म्हटले होते. यापूर्वी केंद्रात भाजपाची सत्ता असताना, मागणी नसतानाही तीन राज्याची निर्मिती केली होती. तेव्हा बहुमताची गरज नव्हती का, असा सवाल जनमंचने केला आहे. सत्ताधारी नेत्यांची भाषा बदलत आहे. शिवसेनेला समोर करून ठोस भूमिका घेतांना दिसत नाही. नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे विधानसभेपूर्वी केंद्राकडून ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा विदर्भाची मागणी पुन्हा रखडेल. जनमंचने सरकारवर दबाव बनविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आखला आहे. जनतेमध्ये जाऊन लोकांना संघटित करणे, आवश्यकता भासल्यास त्यांच्या संघटित शक्तीचे आंदोलनाच्या माध्यमातून प्रगटीकरण करणे, असा कार्यक्रम जनमंच राबविणार आहे. आंदोलनाला समाजाच्या सर्व स्तरातून व्यापक पाठिंबा मिळावा या हेतूने जनमंचने लेखक, कलावंत, वकील, प्राध्यापक या वर्गालासुद्धा लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यात कार्यकर्ता बैठका, पथनाट्य, लघुचित्रपट, माहिती पुस्तिकेचे वितरण जनमंच करणार आहे. पत्रपरिषदेला जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, प्रकाश इटनकर, प्रमोद पांडे, रामभाऊ आखरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विधानसभेपूर्वी केंद्राने विदर्भासाठी ठोस निर्णय घ्यावा
By admin | Updated: June 18, 2014 01:28 IST