मुंबई : गटातटांत विभागलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल्या नियमावलीनुसार रिपाइंची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्यभर हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे रिपब्लिकन नेते काकासाहेब खंबाळकर यांनी सांगितले. गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नव्या कार्यकारिणीची घोषणा करताना रिपाइंच्या नावाने गटबाजी करणाऱ्या नेत्यांनी स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे पाडल्याची टीका खंबाळकर यांनी केली. ते म्हणाले, ‘नियमानुसार दर तीन वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होऊन सर्व धर्म आणि जातीच्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी देण्याची आवश्यकता आहे. मात्र बाबासाहेबांच्या नावाने कैक रिपब्लिकन नेत्यांनी रिपाइंच्या नावाने पक्ष काढून जनतेची फसवणूक केली आहे. या नेत्यांनी स्वत:ला आणि नातेवाइकांना सत्तेत वाटा मिळाल्यानंतर कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांचा विचारच केला नाही. मात्र आता पक्षाची पुनर्बांधणी करताना बाबासाहेबांच्या नियमावलीचे पालन करून राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय कोणतीही व्यक्ती आजन्म अध्यक्ष म्हणून राहणार नाही, याचीही काळजी घेण्यात येईल.’लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभर सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नव्या कार्यकारिणीत खंबाळकर यांनी कोणतेही पद घेतले नसून राष्ट्रीय अध्यक्षपदी समाधान नारकर यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी रा.सू. गवई आणि के.एस. अहिरे उपस्थित होते.
रिपाइंच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा
By admin | Updated: January 30, 2015 05:15 IST