Walmik Karad Latest News: सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मीक कराडला मुख्य आरोपी केले आहे. मात्र, सीआयडीच्या आरोपपत्रातील एका विधानावर या प्रकरणात आधीपासून भूमिका मांडणाऱ्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. वाल्मीक कराड सुटण्याची ही पळवाट आहे का? असा प्रश्न करत ते वाक्य वगळण्याची मागणी दमानियांनी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सीआयडीच्या आरोपपत्रातील एक पान अंजली दमानिया यांनी पोस्ट केले आहे. एक विधान अधोरेखित करत हे धक्कादायक आहे असे दमानियांनी म्हटले आहे.
अंजली दमानियांचा आक्षेप काय?
सोशल मीडियावर पोस्ट करत अंजली दमानियांनी म्हटलं आहे की, "बीड स्व. संतोष देशमुख प्रकरणातील कालच्या चार्जशीटमध्ये हे कसे आणि का लिहिले गेले?", असा सवाल त्यांनी केला आहे.
"पान ३६ वर 'टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले' असे का लिहिले? तो टोळीचा प्रमुख कसा? (खाली वाचा ) पुढच्या पानावर जरी वाल्मीक कराड नंबर एकवर असेल, तरीही हे वाक्य वगळले पाहिजे", अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे.
"वाल्मीक कराडबद्दल फक्त लिहिण्यात आले की त्यांनी 'आता जो कोणी आड येईल, त्याला अडवा करावा लागेल, असे त्यांनी सुदर्शन घुले यांना सांगितले आणि कामाला लागा आणि विष्णु चाटेशी बोलून घ्या' एवढेच चार्जशीटमध्ये लिहिले आहे. उद्या वाल्मीक कराड म्हणतील, मी कुठे त्यांना मारा असे म्हटले? ही सुटण्याची पळवाट आहे का?', असा सवाल अंजली दमानियांनी केला आहे.
आरोपपत्रात सुदर्शन घुलेबद्दल काय?
सर्व गुन्हे संघटीत टोळीच्या माध्यमातून संघटीत टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी. टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी, तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी, संघटितरित्या व एकट्याने व वेगवेगळ्या साथीदाराच्या मदतीने केलेली आहेत. सदर टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले हा आहे, असे सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहेत. यातील शेवटचे वाक्य वगळण्याची मागणी अंजली दमानियांनी केली आहे.