मुंबई - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पर्यायी चार रस्त्यांच्या कामांना तातडीने निधी दिला जाणार आहे.
मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई- गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता असे हे चार रस्ते असून, त्यासाठी आवश्यक १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
ज्या कामांसाठी राष्ट्रीय महामार्गातर्फे निधी उपलब्ध होऊ शकत नाही, त्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वस्त केले. या महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, जास्तीचे मनुष्यबळ तैनात करण्यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दक्षता घेण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.