रंग मिसळल्यास गूळ उत्पादकांवर कारवाई

By Admin | Updated: May 23, 2015 00:23 IST2015-05-22T23:47:34+5:302015-05-23T00:23:04+5:30

मंत्री बापट म्हणाले, रंग मिसळलेला गूळ खाल्ल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे गुळाचे नमुने घेऊन काही विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Action on jug manufacturers if color mixing | रंग मिसळल्यास गूळ उत्पादकांवर कारवाई

रंग मिसळल्यास गूळ उत्पादकांवर कारवाई

कोल्हापूर : गूळ चांगला दिसण्यासाठी त्यात विषारी रंग मिसळू नये, याकरिता शेतकरी, उत्पादकांत जागृती करणार आहे. तरीही असे रंग मिसळून भेसळ केल्यास गूळ उत्पादकांवरही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी दिला. भेसळ रोखण्यासाठी केवळ दंडच नव्हे, तर सश्रम कारावासाची शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यात बदल करणार आहे, असे त्यांनी सांगितले.अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११ संबंधी गूळ उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांची कार्यशाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. या कार्यशाळेत ते बोलत होते. आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते. मंत्री बापट म्हणाले, रंग मिसळलेला गूळ खाल्ल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे गुळाचे नमुने घेऊन काही विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. दाखल गुन्ह्यांचे पुढे काय करायचे, यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. जाणीवपूर्वक कोणालाही त्रास देण्याचा हेतू नाही. गुळातील भेसळ कधीतरी रोखावीच लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात दुरुस्ती करताना उत्पादक, शेतकरी, व्यापारी या सर्वांना विश्वासात घेणार आहे. आगामी काळात सर्व गुऱ्हाळचालकांची नोंदणी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेणार आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाचा गूळ मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळायला हवेत, यावर लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक बाजारपेठेतही गुळाला चांगली मागणी आहे. औषध बनविण्यासाठीही गुळाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यास नवीन तंत्रज्ञान दिले जाणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, गुऱ्हाळचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. सर्व अडचणी सोडवून शासनाने गूळ उत्पादकांना तरी ‘अच्छे दिन’ येण्यासाठी मदत करावी.
राज्य गूळ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दीपक शहा म्हणाले, सध्याच्या कायद्यातील जाचक अटींमुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. जबर दंड केला जात आहे, हे पूर्णत: चुकीचे आहे. वालचंद संचेती, शरद शहा यांचे भाषण झाले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, उदय वंजारी, सुरेश देशमुख यांच्यासह उत्पादक व व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


केवळ मुलगी
सुंदर असून...
विवाहावेळी केवळ मुलगी सुंदर बघून चालत नाही. ती घरच्यांना सांभाळते की नाही, याचाही विचार केला जातो. परदेशातील कोणती तरी मुलगी आणून तिला बायको म्हटल,े तर घरादाराची वाट लागते. तसेच केवळ गूळ चांगला दिसून उपयोग नाही, तो खायलाही पोषक असायला हवा, असे मंत्री बापट यांनी सांगताच एकच हशा पिकला.

Web Title: Action on jug manufacturers if color mixing