ठाणे : विक्रीवरील तुटपुंजे कमिशन वाढवून देण्याच्या मागणीसाठी ठाण्यातील विक्रेत्यांनी गोकुळ, वारणा, महानंद, अमुल आणि मदर या पाच कंपन्यांच्या दुधावर गेल्या १० दिवसांपासून बहिष्कार घातला होता. राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देऊन यावर तोडगा काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची माहिती ठाण्यातील दूध विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. वैधमापनशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय पांडे यांनी दूध विक्रेत्यांवरील अन्यायाबाबत पुढाकार घेऊन बापट यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ठाण्याचे पदाधिकारी पांडुरंग चोडणेकर यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी तसेच या पाचही कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वितरक उपस्थित होते.गेल्या १० दिवसांच्या बहिष्कारामुळे एकट्या ठाणे शहरातून १२०० विक्रेत्यांकडून या पाच कंपन्यांच्या प्रतिदिन तीन लाख लीटर दूध विक्रीवर परिणाम झाल्याने या कंपन्यांना रोज सव्वा कोटीचा फटका सहन करावा लागला. त्यातच दिवा, मुंब्रा, पनवेलपर्यंतच्या विक्रेत्यांनी या दुधावर बहिष्कार टाकल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत होते.
दूध बहिष्कार आंदोलनाला १५ दिवसांची स्थगिती
By admin | Updated: May 2, 2015 01:25 IST