राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. मुंबई, पुण्यासह कोकणातही जोरदार पाऊस सुरूआहे. पुण्यात आज दिवसभर पाऊस सुरू होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांचेही नुकसान झाले आहे. पुण्यात झाड उन्मळून पडल्याने आतापर्यंत दुसरा बळी गेला आहे, पुण्यातील निलायम टॉकीजच्या समोर रस्त्यावर झाड पडल्यामुळे रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला. ७६ वर्षीय शुभदा सप्रे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
कोल्हापुरात गेल्या आठ ते दहा दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यातच कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावात भूस्खलन होऊन २० ते २५ घरांना धोका पोहचला आहे. हुपरी रोडवरील मशिदीसमोरील सहामोट विहिर म्हणून ओळखल्या जाणार्या विहिरीच्या संरक्षक भिंतीचे मंगळवारी रात्री पुन्हा एकदा भूस्खलन झाले. उत्तर बाजूच्या रहदारीच्या रस्त्यासह सुमारे ५० फूट संरक्षक भिंत या विहिरीत ढासळली. त्यामुळे विहीर परिसरातील घरांना आणि मशिदीला धोका निर्माण झाला आहे.
जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून, नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. सध्या या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरु केले आहे. मात्र विहिरीच्या कठड्याचे बांधकाम करून लवकरात लवकर रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.