...
पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
निलंगा : शहरातील काही भागातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्ते उखडल्याने खड्डयांचा अंदाज येत नाही. यामुळे काहीजण पडून जखमीही झाले आहेत. शहरात सर्वत्र पथदिवे बसवावेत, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून पालिकेकडे करण्यात येत आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
...
आवक घटल्याने भाजीपाला दर वाढले
उदगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजीपाल्यावर परिणाम होऊन आवक घटली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. सध्या भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. विशेषत: पालेभाज्या मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांना डाळींवर अधिक भर द्यावा लागत आहे. आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
...
साईडपट्टया खचल्याने अपघाताची भीती
नळेगाव : चाकूर तालुक्यातील नळेगाव व परिसरातील रस्त्यांना असलेल्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे एखादे मोठे वाहन आले की, दुसऱ्या वाहनाला रस्त्याच्या बाजूला थांबावे लागत आहे. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन साईडपट्ट्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.