ग्रामीण मार्गावरील प्रवासी भारमान वाढत नसल्याच्या कारणावरून, या बसेस महामंडळ प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आल्या आहेत. ज्या मार्गावर प्रवासी भारमान आहे, त्याच मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या माेठी आहे. लातूर आगारातील ११५ पैकी ७६ बसेस सुरू आहेत. उदगीर आगार - १११ पैकी ७६ बसेस सुरू, अहमदपूर आगार - ९३ बसेसपैकी ५६, निलंगा - ८७ बसेसपैकी ६३ आणि औसा आगारातील एकूण ७९ बसेसपैकी ५३ बसेस सध्याला विविध मार्गांवर सुरू आहेत.
या मार्गावरील फेऱ्या बंद...
ग्रामीण भागातील प्रमुख मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून महामंडळाने टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू केली आहे. ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी नाही, त्या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. हे मार्ग ताेट्यातील आहेत. त्या मार्गावरील प्रवासी सेवाही महामंडळासाठी इंधनाला महाग आहे. मात्र, प्रवाशांचा विचार करून या मार्गावरील बसेस सुरू ठेवण्याची वेळ आली आहे, तर ग्रामीण भागातील ५० टक्के बसेस अद्यापही प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बंदच ठेवण्यात आल्या आहेत.
लांब पल्ल्याच्या मार्गावर जादा बसेसची व्यवस्था...
लातूर विभागातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या मार्गावरील ५० टक्के ऑपरेशन सध्याला बंद आहे. या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने, त्या बसेस बंद करून इतर मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. सध्याला लांबपल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांची हाेणारी गर्दी पाहता, महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे. मात्र, सध्याला याही मार्गावरील २५ टक्के ऑपरेशन बंदच आहे.
एसटीचा खर्च वाढला
डीझेल १०० रुपयांच्या घरात गेले आहे. मात्र, प्रवासभाड्यात कुठलीही वाढत केलेली नाही. आहे त्या प्रवासभाड्यात सध्याला प्रवाशांना महामंडळ सेवा देत आहे. परिणामी, महामंडळाचा कारभार सध्याला ताेट्यात आहे. अशा स्थितीत एसटीचा खर्चही वाढला आहे. हा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न संबंधित प्रशासनाला सतावत आहे. काटकसर करून सध्याला कारभार सुरू आहे.
परिस्थिती सुरधारेल...
ग्रामीण भागातील ५० टक्के, लांबपल्ल्याच्या मार्गावरील ७५ टक्के प्रवासी सेवा सुरू आहे. प्रवाशांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. टप्प्याटप्प्याने परिस्थिती सुधारली, तर बसेसची संख्या वाढविता येणार आहे. प्रवाशांची ज्या मार्गावर गर्दी त्या मार्गावर बसेस सुसाट धावत आहेत.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर.