बेलकुंड : औसा तालुक्यातील टाका - बिरवली मार्गावर काही वर्षांपूर्वी पूल तयार करण्यात आला. मात्र, सध्या या पुलावरील सळई उघडी पडली आहे. त्यामुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
टाका - बिरवली मार्गावरील वाहनधारक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर काही वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र, अवघ्या काही दिवसातच या पुलावरील सळई उघडी पडली आहे. तसेच काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिसरातील काहींनी संबंधित विभागाकडे तक्रार केली. परंतु, त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पुलाच्या डागडुजीचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी होत आहे.