लातूर : लस उत्सवाच्या वलग्ना केल्या. मात्र, आजही तुटवडा कायम आहे. पेट्रोल, डिझेलचा आणि एकूणच महागाईचा भडका उडाला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार तर हवेतच आहेत. केंद्राची सात वर्षे ही निराशाजनक आहेत, अशी टीका वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी केली.
ते म्हणाले, सरकारे येतील जातील. देशात अनेक ठिकाणी भूकंप, नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा त्या-त्या काळात केंद्राने मदत केली. राज्यात कोणते सरकार हे पाहिले नाही. तरुणांना लस मिळू शकत नाही, अराजकाची स्थिती आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही, काँग्रेस जनतेसोबत राहून केंद्रातील सरकारला जाब विचारू.
शेतकऱ्यांना संकटात टाकले, काळे कायदे आणले. महामारीत सर्वांनी एकत्र आले पाहिजे, मात्र दुजाभाव केला जात आहे. जनतेच्या जीविताशी खेळले. देशभर ऑक्सिजन तुटवडा, वितरणात भेदभाव केला. दुसरीकडे रोजगाराच्या निव्वळ घोषणा केल्या. बँका मोडीत काढल्या जात आहेत. सार्वजनिक उपक्रम विक्रीला काढले. देश आणि जनतेला कर्जबाजारी केले आहे, अशी टीकाही देशमुख यांनी केली.