लातूर : जिल्ह्यातील गरसुळी (ता. रेणापूर) येथील शेतात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याचा खून करून दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. २७ मे रोजी उघडकीस आलेल्या या घटनेत चोरट्याने अत्यंत क्रूरपणे अर्धांगवायू झालेल्या वृद्ध व्यक्तीस विहिरीत फेकले, तर वृद्ध महिलेचा डोक्यात कुकर घालून, दगडाने ठेचून तिचा खून केला.
गरसुळी येथील रावसाहेब मुकुंद कातळे (वय ६०) व त्यांची पत्नी पुष्पलता रावसाहेब कातळे (५२) हे दोघेही गावालगत असलेल्या स्वत:च्या शेतात राहतात. रावसाहेब यांना अर्धांगवायू असल्याने ते अंथरुणावरच होते. त्यांचा एकुलता एक मुलगा कामानिमित्त हैदराबाद येथे राहतो. दरम्यान, दोघेच वयोवृद्ध राहत असल्याचा अंदाज घेऊन २५ ते २७ मेदरम्यान चोर शेतात आला. तो चोरी करीत असताना पुष्पलता यांनी विरोध केला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या डोक्यात कुकर घातला, दगडानेही मारले. हा खून होत असताना अंथरुणावर पडलेले रावसाहेब कातळे यांनी पाहिले. त्यानंतर आरोपीने रावसाहेब यांनाही मारहाण करून उचलून शेताशेजारी असलेल्या काकासाहेब पवार यांच्या विहिरीमध्ये फेकले.
२७ मे रोजी खून उघडकीस...
शेताशेजारी पवार यांच्या शेतातील नोकर तण काढण्यासाठी २७ मे रोजी शेतात फिरत असताना विहिरीकडे गेला. त्यावेळी त्याला विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खुनाचा उलगडा झाला. ओळख पटल्यानंतर कातळे यांचे नातेवाईक माउली विष्णू पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
पुष्पलता यांची चोरट्याशी झुंज...
पुष्पलता यांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी विरोध दर्शविला. चोरट्याशी झटापट झाली. घटनास्थळावरील कुकर, दगड आणि पसरलेले साहित्य पाहून नातेवाईक फिर्यादी माउली पवार यांनी खून चोरीच्या उद्देशाने झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर २७ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्ह्यातील आरोपी गावातीलच रहिवासी...
चोरीच्या उद्देशाने वयोवृद्ध दाम्पत्याचा खून करणारा आरोपी गावातीलच असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर १२ तासांत आरोपी पंडित कोंडिबा रावणकोळे याला अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले. आरोपीची चोरीची पार्श्वभूमी असून, यापूर्वी ट्रॅक्टर भरून हरभरा नेऊन त्याने त्याची विक्री केली होती. दरम्यान, पुष्पलता कातळे यांनी आरोपीला ‘चोरट्या, माझ्या शेतात का आलास?’ असे यापूर्वी म्हटले होते. चारचौघांत चोरीचा आरोप केल्याचा राग मनात धरून हा खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.