मराठवाडा जनता विकास परिषद व लॉयन्स क्लब, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर, जळकोट व देवणी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या संवाद विकासासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक रमेश अंबरखाने, बसवराज पाटील नागराळकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, डॉ. रामप्रसाद लखोटीया, प्रा. महेश बसपुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, प्रदीप बेद्रे, बालिका मुळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जलसिंचन या विषयावर व्ही. एम. पाटील, वीज भरत नळगीरकर, उद्योग रमेश अंबरखाने, रस्ते विकास व्ही. एस. कुलकर्णी, आरोग्य प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, शिक्षण प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव, कौशल्य शिक्षण प्रा. एस. एस. पाटील, वृक्ष लागवड व संवर्धन डॉ. प्रकाश येरमे, अदिती पाटील, राहुल आलापुरे, पशु संवर्धन डॉ. प्रकाश देशपांडे, दुग्ध व्यवसाय प्रा. डॉ. बी. आर. चव्हाण, रेल्व विकास मोतीलाल डोईजोडे, कायदा व सुव्यवस्था युवराज धोतरे, लोककला- महिला व बालविकास डॉ. बाळासाहेब दहिफळे, रसूल पठाण, तर सेंद्रिय शेती विकास श्याम सोनटक्के, बँक व बचत गट या विषयावर महादेव खताळ यांनी विचार मांडले. यानंतर बसवराज पाटील-नागराळकर, डॉ. रामप्रसाद लखोटीया यांनी मनोगत व्यक्त केले. या सर्व प्रश्नांचा आढावा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला. यातील रस्ते, वीज व पाणी यासह महत्त्वाच्या विषयासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून, लवकरच हे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन दिले. एमआयडीसीसाठीही शासन स्तरावर प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत करणे, सीसीटीव्ही कॅमेरे, सिग्नल बसविणे, उड्डाणपूल व वळण रस्ता चालू करणे यासाठी निधीची तरतूद व अंमलबजावणी तत्काळ करणार असल्याची ग्वाही दिली.
सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जनता दरबार घेणार असल्याची माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली. यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेचे डॉ. रामप्रसाद लखोटीया, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. प्रवीण जाहुरे, अरविंद पत्की, गौरव जेवळीकर, महादेव खताळ यांच्यासह लॉयन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.