लातूर : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारा अनुप भीमराव गावंडे पाच वर्षांपूर्वी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तो आजही नागपुरात घरीच अंथरुणावर आहे. नेमके त्याच्यासोबत काय घडले, याचा उलगडा अद्यापि न झाल्याने अनुपचे वयोवृद्ध वडील मुलाला न्याय देण्यासाठी एकीकडे धडपडत आहेत, तर दुसरीकडे दीर्घकाळ कोमात राहिलेल्या मुलाच्या पुढील उपचार खर्चासाठी चिंतित आहेत.
वडील भीमराव गावंडे यांनी सोमवारी ‘लोकमत’ला सांगितले, ७ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री ११.३० वाजता लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील स्वच्छतागृहात त्यांचा मुलगा बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. अनुप बधिरीकरण विभागात एम.डी. करीत होता. ९ ऑगस्ट २०१५ रोजी भीमराव गावंडे यांचा महाविद्यालय रुग्णालयातील पोलीस चौकीमध्ये जबाब घेण्यात आला. अनुपच्या तपासणीमध्ये त्याच्या ब्रेनचे टिश्यू निकामी झाल्याचे कळले. तो दीर्घकाळ कोमात होता. आजही तो परिपूर्ण बोलत नाही. तो बरा होईल आणि नंतर घटना कळेल म्हणून आई-वडिलांनी उपचारावर लक्ष केंद्रित केले होते. नंतर त्याच्यासोबत नेमके काय घडले, पोलिसांनी तपासात पुढे काय केले, याबाबत भीमराव गावंडे यांनी लातूरच्या संबंधित पोलीस स्टेशनला माहिती अधिकारात तीन अर्ज केले. त्यावर सदर घटनेची नोंद नसल्याचे उत्तर देण्यात आले.
दरम्यान, अनुप अजूनही अंथरुणावर असून, तो पुढे किती काळ असाच राहील, सांगता येत नाही. देखभालीसाठी परिचारिका आणि फिजिओ थेरपिस्ट घरी येतात. आजवर उपचाराचा भरमसाठ खर्च झाला असून, घर, शेती, दागिने विकून झाले. सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या भीमराव गावंडे यांनी पेन्शनवरही ५ लाखांचे कर्ज घेतले आहे. अनुपची ही स्थिती कशामुळे झाली हे कळावे म्हणून अजूनही अस्वस्थ आहोत आणि त्याचा पुढे सांभाळ कसा करायचा, याचीही आर्थिक विवंचना असल्याचे गावंडे म्हणाले. दरम्यान, याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून नोंद नाही, असेच उत्तर मिळाले आहे.