जिल्ह्यात यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झाला असून मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शिवारातील पीक वाया गेले आहे. अतिपावसामुळे बुरशी आणि हळद्या रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर पडला आहे. त्यामुळे काढणीला वेळ लागणार आहे. सध्या मिळत असलेला भाव राहतो की डाग असल्याचे कारण सांगून दर कमी केले जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या तरी चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या सोयाबीनलाही चांगले दर मिळतील अशी अपेक्षा आहे.
सध्या बाजारात सोयाबीनला कमाल दर ९ हजार १०० रुपये तर किमान दर ६ हजार ७०० रुपये असून सर्वसाधारण दर ८ हजार ९१० रुपये आहे. हाच दर स्थिर राहिला तर शेतकऱ्यांना त्याचा बऱ्यापैकी फायदा होईल असे बोलले जात आहे. सध्या बाजारात साळ, गहू, ज्वारी, हरभरा,ज्वारी रब्बी, मका, हरभरा,तूर, मूग, उडीद आदी पिकांची आवक असून हरभऱ्याला कमाल दर ६ हजार ६४७ रुपये तर किमान दर ४ हजार ४०० आणि सर्वसाधारण ५ हजार रुपये आहे. मूग, उडीदाची आवकही कमीच आहे. मुगाची आवक ९७५ असून उडीदाची आवक २०६५ क्विंटल आहे. मुगाला सहा हजार रुपये तर उडीद आला सात हजार रुपयाचा दर सध्या बाजारात मिळत आहे.
सोया पेंड आयातीचा निर्णय शेतकऱ्यांना नुकसान कारक...
केंद्र शासनाने सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन परदेशातून येण्याची वेळ आणि नवे सोयाबीन बाजारात येण्याची वेळ एकच असल्याने सोयाबीनचे भाव पडतील असे शेतकरी संघटनेसह शेतीशी निगडित असलेल्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सोयाबीन आयातीला विरोध दर्शविला आहे. सोयापेंड आयात झाली तरी नव्या सोयाबीनचे दर सध्या सारखेच राहावेत अथवा ठेवावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.