यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मनपा आयुक्त अमन मित्तल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले,जिल्ह्यात सामाजिक,आर्थिक,औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होत असून आजच्या लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाची ऊर्जा लाभली आहे. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद, काश्मीर व जुनागढ संस्थानातील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडले गेले. त्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता. त्यावेळी लातूर जिल्हा हा उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग होता. त्यात लातूर जिल्ह्याचे योगदानही मोठे होते. मराठवाडा मुक्तिसंग्राम सतत १३ महिने सुरू होता. या लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येण्यास तयार नव्हता, त्यावेळी भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरू केली. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त झाला. या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. या लढ्यानंतर लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
जिल्ह्यात १६ सर्कलमध्ये ६५ टक्के पर्जन्यमान झाले असून यात ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यांनी ७२ तासाच्या आत ऑनलाईन, ऑफलाईन, पद्धतीने अर्ज करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांना निश्चितच मदत मिळणार आहे. सध्या कोविडची दुसरी लाट ओसरत असून संभावित तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्या लाटेचा समाना करण्यासाठी सर्वांनी सर्तक राहावे, असे अवाहवन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सैनिकांचा गौरव...
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.