उदगीर : गत महिन्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील एकूण १४ मध्यम, साठवण व लघु प्रकल्पातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बहुतांश लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. देवर्जन व तिरू मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ६९ टक्के व ७५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे यंदा खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. पिकेही बहरली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात जवळपास २५ दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे चिंता वाढली होती. दरम्यान, मागील महिन्यापासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील १४ प्रकल्पांत चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
तालुक्यातील देवर्जन व तिरू दोन मध्यम प्रकल्प, करखेली, बामाचीवाडी, गुडसूर व डाऊळ हिप्परगा हे चार साठवण तलाव तर केसगीरवाडी, पिंपरी, नागलगाव, गुरदाळ, कल्लूर, एकुर्का रोड, निडेबन, कोदळी व चांदेगाव हे लघु प्रकल्प आहेत. देवर्जनमध्ये ६९ टक्के तर तिरू मध्यम प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गुडसूर, डाऊळ हिप्परगा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. करखेली १२.१८ टक्के तर बामाचीवाडी साठवण प्रकल्पात १०.७९ टक्के पाणी उपलब्ध आहे. केसगीरवाडी, पिंपरी, नागलगाव, गुरदाळ, कल्लूर, एकुर्का रोड, निडेबन, कोदळी, चांदेगाव आदी ९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या रबी हंगामासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. आणखीन पावसाळा शिल्लक असल्याने मोठ्या पावसाची अपेक्षा असून एक- दोन पावसांतच तालुक्यातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतील, अशी अपेक्षा आहे.
बनशेळकी तलाव भरला...
उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारा बनशेळकी तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शहराला भविष्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. सुरळीत पाणीपुरवठा करता येईल, अशी माहिती नगराध्यक्ष बसवराज बागबंदे व पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले यांनी दिली.
पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही...
यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही. तसेच शेतकऱ्यांना रबी हंगामात पिकांसाठीही फायदा होईल, असे वाढवणा लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता नईम मोमीन यांनी सांगितले.