वडवळ नागनाथ : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटावर १३ सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्र सुरू झाल्याने यात्रा भरली आहे. यात्रेसाठी राज्यासह इतर राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र, रेल्वेचा सोपा मार्ग असून, केवळ रेल्वे वडवळ नागनाथ स्थानकावर थांबत नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.
हैद्राबाद-परळी वैजनाथ या ब्राॅडगेज लाईनवर असलेले निजामकालीन वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशनवर कोणत्याच सुविधा नाहीत. स्टेशन मास्तरअभावी पार्सलची सुविधा नाही. काही वर्षांपूर्वी या स्थानकावरून भाजीापाल्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे परंतु, पुरेसे कर्मचारी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने संजीवनी बेटावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे थांबविण्यास परवानगी द्यावी, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, निवारा, एटीएम मशीन आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
सर्वदूर परिचित असलेले संजवनी वनस्पती बेट व नऊ नाथांपैकी एक नाथ नागनाथ महाराजांचे मंदिर वडवळ येथे असून, टॉमेटो व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. लातूर रोड, चाकूर, उदगीर येथे काॅलेज व शाळेला जाणाऱ्या विद्यार्थांची संख्याही अधिक असल्याने रेल्वे साेयीची ठरते. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे थांबविण्याची मागणी होत आहे.
पंधरा दिवस पर्यटकांची असते ये-जा...
सध्या उत्तरा नक्षत्र सुरू झाले असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील संजीवनी बेटावर पर्यटकांबरोबरच, वैद्य, हकीम यांची पंधरा दिवस रेलचेल असते. मात्र, हैद्राबाद-औरंगाबाद ही पॅसेंजर गाडी कोरोनाकाळापासून रेल्वे प्रशासनाने येथे थांबा बंद केला आहे. थांबा लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
स्थानकावरून धावतात या गाड्या...
वडवळ नागनाथ स्थानकावर हैद्राबाद-औरंगाबाद, हैद्राबाद-पूर्णा, निजामाबाद-पंढरपूर, परळी-मिरज या पॅसेंजर गाड्या थांबत होत्या. औरंगाबाद-बंगलोर, शिर्डी-काकीनाडा, नांदेड-पनवेल या एक्स्प्रेस गाड्याही धावतात. मात्र, या थांबत नसल्याने गैरसोय होत आहे. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मदतीने लक्ष दिल्यास स्थानकाचा विकास होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.