खाद्यतेलाला महागाईचा फोडणी; वर्षभरात दर पोहोचले दुपटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:04+5:302021-05-11T04:20:04+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे धास्ती पसरली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. ...
कोरोनाच्या संसर्गामुळे धास्ती पसरली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत खाद्यतेलाच्या दरात मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे कोविड संकटाबरोबरच महागाईमुळे सर्वसामान्य होरपळत आहेत.
गतवर्षी सोयाबीन तेलाची किंमत प्रतिकिलो ८० ते ९० रुपयांपर्यंत होती. मात्र, सध्या हा दर १७० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच विक्रीसुद्धा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक इतर खाद्यतेलाच्या तुलनेत सोयाबीन तेलाचे दर कमी असल्याने त्यास पसंती देतात. मात्र, आता सोयाबीन तेलाच्या दरात वाढ झाल्याने घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकेकाळी ग्रामीण भागातील सूर्यफूल, करडी, जवसाच्या तेलाचा वापर होत असे. परंतु, आता शेतात सूर्यफूल, करडी, जवस ही पिके तुरळक प्रमाणात घेतली जात आहेत. तसेच तेलाचे घाणेही कमी झाले आहेत. आता सोयाबीन तेल फिल्टर होऊन मिळत आहे.
महागाईचा भडका
सध्या हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. महागाईमुळे संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे, असे येथील रमेश पाटील यांनी सांगितले.