दृढनिश्चय, मेहनतीने यश मिळतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:20 AM2021-04-20T04:20:17+5:302021-04-20T04:20:17+5:30
लातूर : शासकीय नोकरी मिळाली म्हणजे, आपण स्थिर होऊ ही भावना असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ...
लातूर : शासकीय नोकरी मिळाली म्हणजे, आपण स्थिर होऊ ही भावना असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यश मिळवायचे असेल तर दृढनिश्चय, मेहनत आणि योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत नांदेड येथील अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी येथे व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या बी. ए. स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांची उपस्थिती होती. विजय कबाडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी इतरांच्या यशाकडे न पाहता स्वतःमधील सुप्त गुण ओळखून तयारीला लागले पाहिजे. आपण देत असलेल्या परीक्षेचा अभ्यासक्रम, संकल्पना, अभ्यासाचे नियोजन याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक विषयातील बारकावे समजून घ्यावेत. संकल्पना समजण्यासाठी संदर्भग्रंथांचा अभ्यास करावा. गटचर्चेमधून काही अवघड घटक समजण्यासाठी मदत होते. असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. माधव शेळके यांनी तर प्रा. प्रमोद जैन यांनी आभार मानले. ऑनलाईन कार्यशाळेस स्पर्धा परीक्षा विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापकांची उपस्थिती होती.
मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवणे गरजेचे...
यश मिळेपर्यंत स्वतःला प्रेरित करून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात शासकीय अधिकारी म्हणून काम करताना सामाजिक भान, लोकांप्रति प्रेम बाळगून शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी लागते, असेही नांदेड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे म्हणाले.