छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव निमित्त आयोजित व्याख्यानमालेत नगर परिषद व्यापारी संकुलाच्या प्रांगणात दुसरे पुष्प सुबानअली शेख यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी आडत व्यापारी लहु राजुळे होते. यावेळी कृऊबाचे सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील, कल्याण पाटील, विजय निटुरे, मराठा सेवा संघाचे विवेक सुकणे, माधव हलगरे, सतीश पाटील मानकीकर, अहमद सरवर, जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता जाधव, डाॅ. अंजुम खादरी, अनिता जगताप यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सुबानअली शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हा आचरणाचा विषय आहे. इमानदारी जातीवरून नाही, तर कर्तृत्वावरून ठरते. म्हणून शिवरायांच्या राज्यात ३५ टक्के मुस्लिम मावळे होते, हा इतिहास आहे. इतिहास घडविला पण लेखणी नव्हती. म्हणून आज धर्मनिरपेक्षता जोपासणा-या छत्रपतींचा खरा इतिहास समजावून सांगण्याची गरज आहे, असे सांगून शत्रूला ही हेवा वाटावा असे चरित्र व चारित्र्य असलेल्या छत्रपतींच्या विचाराने मानवतावादी व धर्म निरपेक्ष महाराष्ट्र घडवून आदर्श समाजाची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केले. सुत्रसंचालन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढगे यांनी केले. तर जिजाऊ वंदना केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे यांनी घेतली. तब्बल २ तास सुरू असलेल्या या व्याख्यानमालेस न. प. चे व्यापारी संकुल खच्च भरले होते. यासाठी राजकुमार कानवटे, भरत पुुंड, कालिदास बिरादार, गणपत गादगे यांच्यासह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड च्या पदाधिकारी, सदस्यांंनी पुढाकार घेतला.
शिवरायांचे कार्य आणि चारित्र्य जनतेसाठी समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST