शहरातील तिपण्णानगराच्या बाजूस अनधिकृतरित्या उघड्यावर मांस, चिकन विक्रीची दुकाने असल्याने ती हटविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे बुधवारी पालिकेने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून २३ दुकाने जमीनदोस्त केली. दरम्यान, पुन्हा येथे अतिक्रमण होऊ नये म्हणून गुरुवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याच मागणीसाठी १६६ नागरिकांनी शुक्रवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. अतिक्रमण हटविण्यात आल्याने नागरिकांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी विशेषाधिकार लोकमंचचे भरत विटकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, संजय देवकर, रवी शिंदे, सुनील गायकवाड, प्रिती चव्हाण, अशोक कासले, अनिल पवार, अनुसया पवार, अमोल कासले यांच्यासह तिपण्णानगरातील नागरिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांचे निवेदन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी स्वीकारुन आंदोलनकर्त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
***