अहमदपूर नगर परिषदेंतर्गत १७ हजार मालमताधारक असून, त्याचबराेबर शहरात प्रतिदिन दहा टनांपेक्षा अधिक कचरा जमा होत आहे. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी निविदा सादर केल्या जातात. मात्र, यावर्षी मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घनकचरा व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यामध्ये शहरातील सर्व मालमत्ताधारकांना एक बारकोड दिला जाणार आहे. कचरा व्यवस्थापन करणारा कर्मचारी आपल्या मोबाइल ॲपद्वारे त्या बारकोडवर स्कॅन करेल आणि दररोजचा कचरा घेऊन जाईल. एखाद्या दिवशी त्यांनी स्कॅन नाही केला तर कचरा घेऊन गेला नाही, असे सिद्ध होणार आहे. ७० रुपये प्रतिमहिना दराने कचरा संकलन केले जाणार आहे. त्यातच त्याचे विलगीकरण करणे बंधनकारक आहे. त्यात प्लास्टिक कचरा, ओला कचरा, विलगीकरण करणे घनकचरा केंद्रावर वाहतूक करणे, त्यावर प्रक्रिया करणे, ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आणि त्याची विक्री करणे आदी नियम बंधनकारक आहेत. सदर घनकचऱ्याबरोबर अहमदपूर शहरातील नाल्या काढण्यासाठी ‘जीपीआरएस’चा वापर होणार असून, प्रतिमीटर प्रमाणे नाल्याचा दर ठरविण्यात आला आहे. तसेच या घनकचरा व्यवस्थापनाचे चार टप्पे करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात संकलन, दुसऱ्या टप्प्यात वर्गीकरण, तिसऱ्या टप्प्यात वाहतूक आणि चौथ्या टप्प्यात घनकचरा प्रक्रिया गृहीत धरून काम करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक असणाऱ्या कचऱ्याचे रिसायकलिंग करण्यासाठीसुद्धा यंत्रणा उभी करावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या निर्देशाप्रमाणे सदर घनकचरा जमा करायचा असून, झिरो गार्बेज पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकल प्रत्येक घराची अँड्रॉइड ॲपद्वारे नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि नागरिकांनाही घनकचरा व्यवस्थापनाची इत्थंभूत माहिती मिळणार आहे. या आधुनिक नवतंत्रज्ञानामुळे होणारा अनियमितपणा, भ्रष्टाचार कमी होणार असून, यासाठी सर्वच नगरसेवकांनी सहकार्य केले असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
तंत्रज्ञानामुळे मानवी चुका कमी...
अनियमितता कमी दरवर्षी मनुष्यबळ कमी असणे वाहने नादुरुस्त असणे कचरा न उचलणे अशा अनेक समस्या येत होत्या. त्या समस्यांवर मात करण्यासाठी बारकोड पद्धत लागू केली असून, अँड्रॉइड ॲपद्वारे सदर व्यक्तीने जमा केलेल्या घराच्या तपशीलाची नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार कमी होणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.
२०० रुपये दंड आकारला जाणार...
कचरा संकलन न केल्यास दंडाची तरतूद नगर परिषदेने अभ्यासपूर्ण रीतीने नियोजन तयार केले असून, त्यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच एखाद्या मिळकतीचा कचरा न उचलल्यास, त्यासंबंधी तक्रार आल्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता होणार असल्याचे नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे यांनी सांगितले.