चाकूर : शहराच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र यावे. शहरातील प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लीटर पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव माकणे यांनी येथे केले.
चाकूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वेत्तमराव कुलकर्णी होते. यावेळी केशव गोलावार, अलगरवाडीचे सरपंच गोविंदराव माकणे, सुधाकरराव लोहारे, शिवकुमार सोनटक्के, कपिल माकणे, तुराबअली सय्यद, नारायण बेजगमवार, मन्मथ पाटील, चंद्रकांत स्वामी उपस्थित होते. माकणे म्हणाले, शहरातील सर्व प्रभागांमध्ये विकासाची कामे केली जाणार आहेत. आगामी काळात विकासाची कामे करून चाकूर नगर पंचायत देशात पहिली आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. विकासकामांसाठी ४५० कोटींच्या निधीची आवश्यकता असून, तो शासनाकडून उपलब्ध करुन घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. यावेळी कपिल माकणे म्हणाले, शहराचा विकास व सौंदर्यात भर घालण्यासाठी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. यावेळी माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. युवराज पाटील, साजीद लखनगावे, मोहीब पठाण, पपन कांबळे, आदी उपस्थित होते.