चाकूर (जि. लातूर) : पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या दर्शनानंतर नांदेडकडे निघालेल्या भाविकांच्या भरधाव कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघात आठ जण जखमी झाले. ही घटना नांदेड-लातूर महामार्गावरील अलगरवाडी पाटी येथे रविवारी दुपारी ३:३० वाजता घडली. कारला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या कार चालकाने प्रसंगावधान राखत स्वत:ला वाचिवण्यासाठी कार महामार्गाखाली नेली. हा अपघात एवढा भीषण होता, की एअर बॅगमुळे कारमधील भाविक बालंबाल बचावले.
नांदेड येथील सागर नागठाणे (वय ३३), पांडुरंग रोडे (३५), रावसाहेब खल्लवाड (४५) हे एमएच ०२-बीझेड ५४२५ क्रमांकाच्या कारमधून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, रविवारी ते नांदेडकडे निघाले हाेते. त्यांची कार चाकूर शहराचा वळण रस्ता पार करून काही अंतर पुढे गेली असता, अचानक धावत्या कारचे टायर फुटले. यावेळी कार दुभाजक ओलांडत उजव्या बाजूच्या मार्गावर गेली. कार चालकाने प्रसंगावधान दाखवत कार थांबवली. दोन्हीही कारमधील प्रवासी जखमी झाले. यात दोन्ही कारचे माेठे नुकसान झाले.
मुखेड येथून कार (एमएच २६-सीपी ६१४४) लातूरच्या दिशेने जात होती. कारमध्ये महेश माधव कुदळे (वय २६), राजू सुरेश रणभिरकर (४३), सुनील सुरेश रणभिरकर (४१), रत्नाकर गंगाधर कळसकर (४३) आणि माधव इबितवाड (५६) हे जात होते. यावेळी पंढरपूर येथील देवदर्शनावरून नांदेडकडे जाणाऱ्या कारने (एमएच ०२-बीझेड ५४२४) चाकूर ओलांडले. यावेळी धावत्या कारचे टायर फुटले. चालकाने प्रसंगावधान राखत कारवर नियंत्रण मिळविले. मात्र, कार महामार्गाचे दुभाजक ओलांडून गेली. यावेळी मुखेड येथून लातूरकडे निघालेल्या कार चालकाने समोरून येणारी कार डाव्या बाजूला येत दुभाजक ओलांडून उजव्या बाजूला आल्याचे पाहिले. चालकाने अपघात टाळण्यासाठी कार महामार्गापासून पंधरा फूट खाली नेली अन् एका शेतात थांबली.