अहमदपूर : महिनाभराच्या कालावधीत उघडीप दिलेल्या पावसाने अहमदपूर परिसरात दमदार हजेरी लावल्यानेे तालुक्यातील ३० पैकी १९ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तालुक्यातील प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा झाला असून, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामास मदत होणार आहे.
अहमदपूर तालुक्यात मोघा लघुसाठवण, थोडगा, सावरगाव थोट तलाव, तांबट सांगवी, मावलगाव, खंडाळी, हागदळ, गुगदळ, नागझरी साठवण तलाव; तर सोनखेड, धसवाडी, अंधोरी, ढाळेगाव, हंगेवाडी, येलदरी, कोपरा, भुतेकरवाडी, गौताळाल, काळेगाव, अहमदपूर. वाकी, येस्तार, मोळवण, कावळवाडी, नागठाणा, उगीलेवाडी, पाटोदा, तेलगाव, कौडगाव असे लघू, मध्यम व साठवण असे ३० प्रकल्प आहेत. तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने परिसरातील मोघा, सावरगाव थोट, तांबट सांगवी, मावलगाव, हगदळ, गुगदळ, नागझरी, सोनखेड, ढाळेगाव, येस्तार, कावळवाडी, हांगेवाडी, यलदरी, कोपरा, नागठाणा, उगिलेवाडी, पाटोदा, कौडगाव, केंद्रेवाडी, अहमदपूर प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. मात्र यंदा पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षेतच ठेवले होते. पावसाने ओढ दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या काळजीत भर पाडली होती. पावसाच्या पाण्याची ओढ बसल्यामुळे पिके हातची जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे. हा पाऊस जनावरांच्या चाऱ्यालाही फायदेशीर आहे; यामुळे दूध व्यावसायिकही सुखावले आहेत. तालुक्यातील प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने अहमदपूर तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना पूर आल्याने तालुक्यातील ३० लघू, मध्यम प्रकल्प व साठवण तलावांत सरासरी ९१ टक्के जलसाठा असून, ११ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांवर आहे. झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामासाठी मदत होणार आहे.
पावसामुळे पशुपालकांनाही मिळाला दिलासा
तालुक्यात पशुुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पावसामुळे पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. दरम्यान, पावसामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांना प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने सिंचनासाठी मदत होणार आहे.
रब्बी हंगामासाठी होणार फायदा
तालुक्यातील बरेच तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामातील रब्बी पिकांचे, उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तलाव भरल्यामुळे विहिरींची, बोअरवेलची पाणीपातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
- प्रवीण लांजे, शेतकरी