मंगळवारी लातूर बाजार समितीमध्ये ८१ क्विंटल गूळ, ८५३ गहू, हायब्रीड ज्वारी ११, रबी ज्वारी ५६२, हरभरा १० हजार ४९, तूर ३ हजार ४१, एरंडी १०, करडी १०३, सोयाबीन ६ हजार १०४ तर ४२८ क्विंटल चिंचोक्याची आवक झाली. गुळाला ३ हजार १६०, गहू १ हजार ९००, हायब्रीड ज्वारी १ हजार, रबी ज्वारी १ हजार ९००, तुरीला ६ हजार ३००, एरंडीला ४ हजार ६५०, करडी ४ हजार ६००, सोयाबीनला ७ हजार ७० तर चिंचोक्याला १ हजार २५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला आहे. गत महिन्यात सोयाबीनचा दर ७ हजार ४०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, सध्या ३०० रुपयांनी दर कमी होत ७ हजार ७० रुपयांवर पोहोचला आहे. शासनाच्यावतीने सोयाबीनला ३ हजार ८७० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्या तुलनेत बाजारात अधिकचा दर मिळत असल्याने बाजार समिती शेतमाल विक्रीला शेतकऱ्यांची पसंती आहे.
हरभऱ्याची आवक १० हजारांवर...
खरीप हंगाम जवळ आला असून, शेती मशागतीसह बियाणे, खतांसाठी आर्थिक अडचण असते. त्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे बाजार समिती प्रशासनाच्यावतीने कोरोना नियमांचे पालन करीत व्यवहार पार पाडले जात आहे. विशेष म्हणजे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी विशिष्ट वेळ ठरवून देण्यात आली असल्याचे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.