जानेवारीमध्ये देवणी तालुक्यातील ३४ गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. यांपैकी एक कमालवाडी येथील निवडणूक बिनविरोध पार पडली; तर उर्वरित ३३ गावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने जो खर्च केलेला आहे, तो वेळेत निवडणूक विभाग तथा उपकोषागार कार्यालयात विहित नमुन्यात दाखल करणे आवश्यक होते. याविषयी निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र निवडणुका होऊन जवळपास एक दीड महिना झाला तरी १६ गावांतील ५६ उमेदवारांनी आपल्या निवडणुकीचा जमाखर्च वेळेत दाखल केला नसल्याची माहिती समाेर आली आहे. हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवाराची माहिती जिल्हा प्रशासनास लेखी स्वरूपात कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वेळेत हिशेब सादर न केलेल्या उमेदवाराची गावनिहाय संख्या पुढीलप्रमाणे असून, विळेगाव - ९, तळेगाव - ७, संगम - ७, कोंनाळी - १, लासोना - ३, वलांडी - १, गुरदाळ - २, धनेगाव - २, जवळगाव - ३, इंद्राळ - ५, कवठाळा - २, बोळेगाव - ३, अंबानगर - ४, होनाळी - १, गोंडगाव - ४ आणि डोंगरेवाडी - २ अशी असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
देवणी तालुक्यातील १६ गावांतील ५६ उमेदवारांनी सादर केला नाही जमाखर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST