75 लाखांचा धनादेश केला अदा
कागल : ब्रिक्स कंपनीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तोटा सहन करून आठ वर्षे कारखाना चालविला. यामध्ये शेतकऱ्यांना एफआरपीसह कामगारांचे पगार-बोनस, तोडणी वाहतूक बिले वेळेवर दिली. मशिनरीवरही प्रचंड खर्च केला आहे. इतके करूनही ब्रिक्सला जणूकाही ईस्ट इंडिया कंपनीच ठरवून त्रास देण्याचा केलेला प्रयत्न आहे. मुश्रीफ साहेब आंदोलनासारख्या मार्गाने तुम्हाला मनस्ताप दिल्याबद्दल, तसेच या काळात तुमच्यावर भलीबुरी टीका केली असेल तर माफ करा; परंतु भविष्यातही या कारखान्याचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न तुम्हीच सोडवा, असे साकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी जि.प सदस्य शिवाजीराव खोत यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घातले.
गेल्या ३६ दिवसांपासून अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. आज यावर मार्ग निघाला. एकूण दीड कोटी थकीत रकमेपैकी ७५ लाखांचे धनादेश आज दिले, तर उर्वरित ७५ लाख एक महिन्यानंतर दिले जाणार आहेत. यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आले होते. तेव्हा शिवाजीराव खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
चौकट
○ ब्रिक्स कंपनीचा रामराम घ्यावा
मंत्री मुश्रीफ म्हणाले, तुम्ही आंदोलनाला बसलाय म्हणून नव्हे तर कंपनीने यावर्षी कारखाना सोडून जायचं हे ठरवलंच होतं. तशी पूर्वकल्पना शासनाला दिलेलीही आहे. हा हंगाम संपण्यापूर्वीच शासनाला तसे लेखी पत्र देणार आहोत. कारण, पुढील हंगाम चालू करण्यासाठी संचालक मंडळाला तयारी करावी लागते. तो अवधीही त्यांना मिळाला पाहिजे. एक लोकप्रतिनिधी म्हणून साखर कारखाना व कर्मचाऱ्यांना आपले सहकार्य कायमच राहील.
फोटो ओळी
कागल अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत देणीपोटी ७५ लाखांचा धनादेश आज ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.