कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडले, असा गौप्यस्फोट न करता राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी राज्याचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मारेकऱ्यांची नावे जाहीर करावीत, ही त्यांची जबाबदारी आहे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शुक्रवारी सकाळी पानसरे स्मारकाच्या भूमिपूजन समारंभात मुश्रीफ यांनी मारेकरी सापडले असून, सरकार त्यांची नावे जाहीर करत नसल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा झाली. त्यावर शिवसेनेने ही मागणी केली आहे. त्यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मुश्रीफ यांनी हा गौप्यस्फोट न करता समाजातील जागरुक नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून संबंधित मारेकऱ्यांची नावेच खरे तर जाहीर करणे ही त्यांची जबाबदारी आहे. पानसरे हत्या प्रकरणात जर का मुश्रीफ हे स्वत:च्या सवंग लोकप्रियतेसाठी या संवेदनशील प्रकरणाबाबत समाजात संभ्रमावस्था पसरविण्याचा प्रयत्न करत असतील, तर ही बाब नक्कीच समाजाच्या हिताची नाही. यासाठी पोलीस प्रशासनाने या गौप्यस्फोटाची खातरजमा करावी. मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याची सत्यता पडताळून पाहावी व असे काही निदर्शनास न आल्यास सामाजिक शांतता व सलोखा बिघडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. मुश्रीफ यांनी केलेला गौप्यस्फोट पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. कारण त्यातून पोलीस प्रशासनाच्या गोपनीयतेच्या तत्त्वालाच हरताळ फासला आहे. ’
मारेकऱ्यांची नावे मुश्रीफच का जाहीर करत नाहीत..?
By admin | Updated: July 26, 2015 00:42 IST