कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळेल की नाही यासंबंधीची चर्चा आम्ही आता थांबवली असल्याची उद्वेगजनक प्रतिक्रिया संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पत्रकारांनी त्यांना यासंबंधी वारंवार विचारणा केल्यावर ‘मंत्रिमंडळात जायला मिळेल म्हणूनच आम्ही संघटना काढली का...?’ अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संघटनेची भाजपला चांगली मदत होऊनही सत्ता आल्यानंतर मात्र भाजपने संघटनेला ठेंगा दाखविला आहे. जिल्हा नियोजन मंडळावरही संघटनेच्या एकाही कार्यकर्त्याला भाजपने संधी दिलेली नाही. ऊसदराच्या प्रश्नांत राज्य सरकार काहीच निर्णय घ्यायला तयार नसल्याने संघटनेने गेल्या आठवड्यात पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाची तोडफोड केली. त्याचा परिणाम म्हणून भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचा पत्ता ‘कट’ केला. त्याअनुषंगाने प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज खासदार शेट्टी यांना पत्रकारांनी गराडा घातला परंतु ते आज बोलण्याच्या मूडमध्ये नव्हते.ते म्हणाले,‘आम्हाला मंत्रिपद मिळेल की नाही यासंबंधीची चर्चा आम्ही आता थांबवली आहे. माझ्यासह कोणताच सहकारी आता याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. आम्ही यापुढे फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांसंबंधी बोलण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्तरानंतरही पुन्हा पुण्यातील आंदोलन व विधानपरिषदेची हुकलेली संधी याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर कॅमेऱ्यापासून बाजूला होत त्यांनी ‘मंत्रिमंडळात जाण्यासाठीच आम्ही संघटना काढली का...?’ असा प्रतिप्रश्न केला. नियोजन समितीच्या बैठकीतही मित्रपक्ष असलेले खासदार शेट्टी हे व्यासपीठाच्या एका बाजूला बसून होते. कामकाजातही त्यांनी फारसा उत्साही सहभाग दाखविला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उजव्या बाजूला ‘राष्ट्रवादी’चे खासदार धनंजय महाडिक हे बसले होते.
मंत्रिपदाची चर्चा आता आम्ही थांबवली
By admin | Updated: January 24, 2015 00:18 IST