राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी तरुण मंडळांना केलेल्या प्रबोधनाने आणखी चार गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना रुजली.
अर्जुनवाडा येथे पहिलवान नामदेव चौगुले, सरपंच संपदा चौगुले, माजी सरपंच शरद पाटील, शहाजी बरगे व ग्रामस्थांनी भक्तिभावाने गावातील सार्वजनिक तालमीमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असलेल्या या परंपरेचा आदर्श आजही टिकून आहे. गावात अनेक गटातटाचे लोक असूनही ही मोहीम नवीन पिढीनेही जोपासली आहे. अनेक वेळा तालुका व जिल्ह्यातून या गावच्या उपक्रमांना विजेतेपद मिळाले आहे.
दूधगंगा नदीकाठावर वसलेले अर्जुनवाडा गाव ३५०० लोकवस्तीचे पहिलवानांचे गाव म्हणून राज्यात ओळख. महान भारतकेसरी व हिंदकेसरी दादु चौगले यांची जन्मभूमी असणाऱ्या गावातील काही जुन्याजाणत्या पहिलवान लोकांनी १९४४ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात गावात एकच गणपती बसवण्याचा संकल्प केला. त्यावेळी पहिलवान भाऊसो यादव, गणपती तिकोडे, दत्तू वागरे, डॉ. दादासो यादव, दिनकर चौगले यांच्या पुढाकाराने श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. गावात एकच जुने तालीम मंडळ आहे. या तालमी शेजारील मंदिरात पहिलवान रूपातील श्री गणेशाची मूर्ती बसवली जाते. त्यावेळी तरुणांना एकत्र करून नामवंत मल्ल घडवण्याचे धडे देणे, गावात एकोपा वाढवणे, ब्रिटिश सरकारविरोधात आणि जुलमी राजवटीविरुद्ध हालचाली आदी खलबते येथे होऊ लागली. अनेक सामाजिक, प्रबोधनाचे उपक्रम राबवले जाऊ लागले. यातूनच पहिलवानांची जडणघडण झाली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक मंडळे आहेत. प्रत्येक गावांत सर्व तरुण मंडळे गणेशमूर्ती बसवतात. यातून इर्षा वाढते, वाद होतात; पण अर्जुनवाडा या सर्च गोष्टींना अपवाद आहे. आज गावांत तालीम मंडळे, तरुण मंडळे, विविध संस्था, राजकीय गटतट आहेत, इर्षा आहे; मात्र या उपक्रमावेळी बाकी सगळे बाजूला ठेवून सर्व गटाचे लोक एकत्र बांधले जातात. ग्रामस्थांच्या एकीमुळे आजही परंपरा शाबूत आहे.