लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वीरशैव को-ऑप. बँकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात तरतूदपूर्व २१ कोटींचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी पत्रकातून दिली. गुंतवणुकीसह एकत्रित व्यवसाय दोन हजार कोटींचा झाला असून निव्वळ एनपीए शून्य टक्के झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या काळातही बँकेने चांगली भरारी घेतली असून, पहिल्या सहामाहीत १२०० कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. मात्र, त्यानंतर संचालक, कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून उद्दिष्ट गाठले. बँकेच्या मार्च २०२१ अखेर ९६४ कोटी ठेवी, ६३२ कोटी कर्जे व ४१४ कोटींची गुंतवणूक आहे. बँकेच्या तीस शाखांपैकी लक्ष्मीपुरी, गडहिंग्लज, मंडई, गांधीनगर व बेळगाव या पाच शाखांचा ढोबळ एनपीएन शून्य टक्के आहे. अहवाल सालात कोरोनामुळे बँक आर्थिक अडचणीत येऊ नये म्हणून सेवकांनी स्वेच्छेने पगारवाढ, महागाई भत्ता घेतला नव्हता, हेही कौतुकास्पद असल्याचे अध्यक्ष सोलापुरे यांच्यासह उपाध्यक्ष रंजना तिवटे, ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे, बाबासाहेब देसाई, राजेश पाटील-चंदूरकर, गणपतराव पाटील, सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, शकुंतला बनछोडे, चंद्रकांत स्वामी, डॉ. दिलीप चाैगुले, महादेव साखरे, राजेंद्र शेटे, राजेंद्र लकडे, अनिल स्वामी, सदानंद हत्तरकी, चंद्रकांत सांगावकर, सतीश घाळी, वैभव सावर्डेकर, राजेंद्र माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मांगलेकर, सरव्यवस्थापक अविनाश खोत यांनी पत्रकात म्हटले आहे.