राजाराम पाटील- इचलकरंजी --शहराच्या वाढीव वसाहतींसह सुमारे ६० टक्के शहरासाठी भुयारी गटार योजना राबविण्यात येणार असल्याने घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. ९७ कोटी रुपये खर्चाच्या योजनेमुळे आणखी १८ दशलक्ष लिटर म्हणजे एकूण ३८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे.शहरात सध्या २० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी भुयारी गटार योजना कार्यान्वित आहे. सुमारे ४० टक्के मूळ गावठाणासह शहरातील वसाहतींचा समाविष्ट या योजनेत आहे. भुयारी गटारीतून जमा होणारे सांडपाणी टाकवडे वेस येथील काळ्या ओढ्यालगत असलेल्या एका विहिरीत जमा होते आणि हे पाणी विद्युत पंपाच्या साहाय्याने आसरानगर येथे असलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्रात नेऊन तेथे प्रक्रिया केली जाते. ही भुयारी गटार योजना साधारणत: २५ वर्षांपूर्वीची आहे.२५ वर्षांत शहराच्या औद्योगिक विकासाबरोबर लोकसंख्येत आणि वसाहतींमध्ये वाढ झाली. तसेच कबनूरची वाढीव वसाहत आणि शहापूरचा समावेश इचलकरंजी पालिका हद्दीत झाला. परिणामी या वाढीव वसाहतींना भुयारी गटार योजनेची गरज भासू लागली. उर्वरित ६० टक्के वसाहतींचा समावेश असणारी नवीन भुयारी गटार योजना तयार केली. तिची तीन वर्षांपूर्वीची किंमत ८२ कोटी रुपये होती.नवीन भुयारी गटार योजनेत १११ कि.मी. अंतराच्या नलिका टाकण्यात येणार आहेत. भुयारी गटारीतून नैसर्गिकरीत्या सांडपाणी जमा होणाऱ्या दोन वेगवेगळ्या उपयोजना आहेत. त्यापैकी एका उपयोजनेत शहापूर गावठाणाची पूर्व बाजू, तोरणानगर, आर. के. नगर, सांगली रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिसराचा समावेश आहे. हे सांडपाणी काळ्या ओढ्यावर एकत्रित करून तेथे ८ दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाईल. उर्वरित उपयोजनेमध्ये शहापूरमधील गावठाण, डेक्कन परिसर, जवाहरनगर, भोनेमाळ, यशवंत कॉलनी, पुजारी मळा, कलानगर, जुना चंदूर रोड, कुडचे मळा अशा परिसरातील वसाहतींचे सांडपाणी चंदूर नाल्यावर एकत्रित केले जाईल आणि तेथे १० दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. काळा ओढा येथील प्रक्रिया केंद्राला ११ कोटी रुपये आणि चंदूर नाल्यावरील प्रक्रिया केंद्राला १२.४१ कोटी रुपये खर्च येणार आहे. अॅडव्हान्स देऊनही कामाला सुरूवात नाहीनवीन भुयारी गटार योजनेची निविदा विस्टाकोर नावाच्या मक्तेदाराला देण्यात आली असून, या निविदेसाठी या मक्तेदाराला १७ कोटी रुपयांचा अॅडव्हान्सही देण्यात आला आहे. याला दोन महिने उलटून गेले तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. त्याबाबत सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीकडूनसुद्धा कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला जात नाही, याचेच आश्चर्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.वाढीव सांडपाण्याचा प्रश्न अनुत्तरितशहरास कृष्णा नदी व पंचगंगा नदीतून ५४ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी ४० दशलक्ष लिटर पाणी गटारीतून सांडपाणी म्हणून वाहत येते. सध्याच्या भुयारी गटार योजनेमार्फत २० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. नवीन भुयारी गटार योजनेतून १८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. तरीसुद्धा उर्वरित दोन दशलक्ष लिटर सांडपाण्याचे काय, हा प्रश्न आहे. याशिवाय शहराच्या आणखीन लोकसंख्या वाढीबरोबर वसाहतीही वाढणार, पर्यायाने वाढीव सांडपाण्याचे काय करणार, हा प्रश्न नगरपालिकेसमोर आ वासून उभा आहे.नवीन सीईटीपीची मागणीइचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाबरोबर येथे उत्पादित होणाऱ्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येतही वाढ होणार. या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या आणखीन एका ‘सीईटीपी’ची आवश्यकता आहे. त्याचाही विचार उद्योजक, व्यावसायिक व लोकप्रतिनिधींनी करावा, अशी मागणी जाणकारांतून होत आहे.
इचलकरंजीसाठी भुयारी गटार योजना
By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST