लोकमत न्युज नेटवर्क
कोडोली : येथील वैभवनगर डवरी गल्लीतील शाळकरी मुले रंगपंचमी खेळून विहिरीत पोहण्यास गेली असताना त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. शिवराज कृष्णात साळोखे (वय १४), शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १५), अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. चार तासांच्या प्रयत्नांनंतर गळाच्या साहाय्याने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे कोडोली गावावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळाबरून मिळालेली माहिती अशी, वैभवनगर येथील पाच- सहा जण सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास रंगपंचमी खेळून झाल्यानंतर बामणाचा मळा नावाच्या परिसरातील कापरे यांच्या विहिरीत अंघोळीसाठी गेले होते. यावेळी शुभम व शिवराज हे कपडे काढून विहिरीच्या काठावर बसले होते. दरम्यान, त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत कोसळले. दोघे पाण्यात बुडाल्याने व बाहेर न आल्याचे पाहून शुभमचा भाऊ भीतीने ओरडत गावात पळत आला. त्यानंतर घरातील लोक व ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली. चाळीस फुटांपर्यंत पाण्याची खोली असल्याने दुपारपर्यंत ते मिळून आले नव्हते. अखेर कोल्हापूर व्हाइट आर्मी व कोडोली येथील गनिमा कावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गळ टाकून शोधमोहीम सुरू केली. शुभम याचा २.४५ वाजेच्या सुमारास, तर शिवराज याचा ३.०० वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला.
शिवराज साळोखे नववीत शिकत होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. शुभम हा आठवीमध्ये शिकत होता, त्याची आई शिलाईची कामे करून उदर्निवाह करते. घटनास्थळी कोडोलीचे मंडळ अधिकारी अभिजित पवार, तलाठी अनिल पोवार, कोतवाल सिराज आंबी, उपसरपंच निखिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक मोरे, बाजीराव केकरे, कोडोली पोलीस ठाण्याचे सपोनि. दिनेश काशीद यांच्यासह पोलीस यंत्रणा उपस्थित होती. यावेळी कोल्हापूर व्हाइट आर्मीचे निखिल लंबू व अजिंक्य सातपुते, तसेच कोडोली गनिमी कावाचे प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, शरद भोसले, सागर मोरे यांनी गळ टाकून मृतदेह बाहेर काढला. यावेळी शशिकांत नलवडे, नथुराम तेली, संतोष निपाणीकर, युवराज मांगलेकर संदीप सांगलेकर, शैलेंद्र सांगलेकर, सुहास जगताप, बाळू जंटली यांनी विशेष प्रयत्न केले.
शुभम पाथरवट याच्या पश्चात आई, एक भाऊ, तर शिवराज साळुंखे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व तीन बहिणी, असा परिवार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
०२ शुभम पाथरवट ०२शिवराज साळोखे फोटो आहे.