संदीप खवळे - कोल्हापूर -सर्प विष मिळविण्यासाठी सापांचा नायनाट करण्याचा राजरोस प्रकार जिल्ह्यात घडत आहे़ आदमापूर येथे सापडलेल्या तरुणांकडे दीड लिटर सर्प विष सापडल्याची घटना उघडकीस आली़ यापूर्वीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्पविष सापडल्याच्या घटना घडल्या आहेत़ मागील वर्षी कागल येथे दोन लिटरच्या दोन बाटल्या सापडल्या होत्या़ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विषाची किमत करोडोंच्या घरात आहे़ अमली पदार्थांमध्ये वापर करण्यासाठीच अशा प्रकारच्या तस्करी होत असल्याचे मत डॉक्टर आणि वन्यजीव मित्रांच्या वर्तुळातून समजते़ उच्चशिक्षित आणि वैद्यकीय ज्ञान असलेले रॅकेटच या व्यवसायात कार्यरत आहे़नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे या जातीच्या सर्पांचे विष मिळविण्यासाठी काचेच्या बाटलीवर प्लास्टिकचा कागद बांधून त्यावर सर्पाला दंश करायला भाग पाडून विष मिळविण्याचा उद्योग तस्करांनी सुरू केला आहे़ आदमापूर आणि कागल येथील घटना प्रातिनिधिक उदाहरणे आहेत़ गुंगी वाढविण्यासाठी अमली पदार्थांमध्ये सर्पांच्या विषाचा वापर केला जातो, पण या विषाची तीव्रता आणि मात्रा रासायनिक प्रक्रियेद्वारा कमी केली जाते़ अमली पदार्थांच्या बाजारपेठेत सापाच्या विषाची किंमत करोडोंच्या घरात असल्यामुळे शिकारीच्या निमित्ताने सर्पाचे विष काढण्यासाठी जंगलात फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे़ जंगल परिसरात राहणाऱ्या तरुणांना या तस्करीच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचे रॅकेट कार्यरत आहे़ विषाचा वापर विविध रोगांसाठी होत असल्याचे भासवून अमली पदार्थांमध्ये कमी मात्रेमध्ये विषाचा वापर होत आहे़ चंदगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीमधील जंगलामध्ये वीकेंडच्या निमित्ताने जंगलात विषाचे संकलन करण्यासाठीच येत असल्याची चर्चा या परिसरातील गुराख्यांमध्ये असते़विष म्हणजे सापाचा पाचक रस, सापाची जात आणि ताकद यानुसार प्रत्येक सर्पांमधून मिळणाऱ्या विषाचे प्रमाण भिन्न असते, पण जास्तीत जास्त विष मिळविण्यासाठी तस्करांकडून अशास्त्रीय पद्धतीने सर्पांचे विष काढून घेतले जाते़ त्यामुळे त्यांचे हाल तर होतात, बऱ्याचदा अशास्त्रीय पद्धतीने सर्पांना हाताळण्याच्या पद्धतीमुळे मृत्यूही ओढावले आहेत़ त्यामुळे जैव साखळी विस्कळीत होऊन पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पैशांपुढे सगळे काही फिके असल्यामुळे तस्करांना याची पर्वा नसते़ जास्तीत जास्त विष मिळविण्यासाठी सर्वच विषारी सापांना पकडून विष काढण्याचा अघोरी मार्ग तस्कर अवलंबत आहेत़रासरोसपणे सुरू असणाऱ्या अशाप्रकारच्या तस्करीकडे वन्यजीव विभागाचे असलेले दुर्लक्ष मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी आहे़ ‘अँटी पॉयझनिंग’प्रामुख्याने सर्पाचा विषाचा प्रयोग ‘अँटी पॉयझनिंग’ म्हणून केला जातो़ यासाठी वैद्यक शाळांकडून शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो़ या पद्धतीमध्ये साप पकडणे, त्याच्या जातीची नोंद ठेवणे, त्याला योग्य ते खाद्य देणे आणि त्याच्यात नैसर्गिकरीत्या तयार झालेले विष मिसळले जाते तसेच त्यावर योग्य ती रासायनिक प्रक्रिया केली जाते. अंधश्रद्धा आणि अज्ञानाबरोबरच ‘बिग मनी’साठी सर्पविषाची तस्करी वाढली आहे़ वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये विषारी सर्पांचे हाल केल्याचे सिद्ध झाल्यास २५ हजारांचा दंड आणि सहा महिन्यांच्या कारावसाच्या शिक्षेची तरतूद आहे. - किशोर शिंदे, निसर्गमित्र
विष तस्करी सापांच्या मुळावर
By admin | Updated: December 19, 2014 00:13 IST