कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता आल्यावर जागा जरी कमी आल्या तरी भाजपचाच महापौर होईल, असे संकेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे दिले. शाहू स्मारक भवन येथे भाजपच्या शंभर सक्रिय सदस्यांची बैठक झाली. प्रमुख उपस्थिती प्रदेश सरचिटणीस रवींद्र भुसारी यांची होती. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजपला कमी जागा मिळाल्या तरी महापौर भाजपचाच होईल, हे ताराराणी आघाडीशी वाटाघाटी करताना ठरले आहे. ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी एकच चिन्ह मिळावे, असे प्रयत्न सुरू आहेत. जर तसे झाले नाही, तर ताराराणी आघाडीचे उमेदवारही कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा विचार होऊ शकतो. शिवसेनेशी युती तुटल्यानंतर भाजपने ताराराणी आघाडीशी हातमिळवणी केली. २०१० चा अपवाद वगळता ताराराणी आघाडी नेहमी सत्तेत आहे. ताराराणी आघाडीचे एकाचवेळी ६० नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे ताराराणी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय आपण घेतला आहे. परंतु या आघाडीशी युती म्हणजे कॉँग्रेसशी युती, असा अर्थ होत नाही. ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक कोणत्याही पक्षात नाहीत. तर अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. मंत्री पाटील पुढे म्हणाले, राज्यात विधानसभा जिंकताना हेच नियोजन केले होेते. सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. संघाला राज्यात आणि देशात काय हवे आहे, याची जाण असलेल्या नेत्यांकडे सत्ता आहे. ‘हृदय’ व ‘अमृत’ योजनेतून शहराला ७०० कोटींच्या आसपास निधी मिळेल. त्यामुळे शहराच्या विकासासाठी महापालिकेत सत्ता येणे आवश्यक आहे. रवींद्र भुसारी म्हणाले, परिश्रमाशिवाय काहीही हाती लागत नाही. आजपासून निवडणुकीचा शंख फुंकला असून, कार्यकर्त्यांनी लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी काम करायचे आहे. जनसंघाच्या काळात आपल्या उमेदवाराची ‘डिपॉझिट’ वाचली, तर आनंद व्हायचा, पण ही स्थिती आता बदलली आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक काळात ८ महिन्यांत देशात ५४३२ ठिकाणी प्रचार कार्यक्रम घेतले होते. याच धडाक्याने महापालिका निवडणुकीत काम करायचे आहे. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील, नगरसेवक सुभाष रामुगडे, जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, उमाताई खापरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘ताराराणी’पेक्षा कमी जागा आल्या तरी महापौर भाजपचाच
By admin | Updated: August 30, 2015 00:41 IST