लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : महाडिकांचे सगळे अर्थकारण ‘गोकुळ’वर चालतेय. ‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करण्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. गोकुळ एकाच्या ताब्यात असून, तो सर्वसामान्य सभासदांच्या ताब्यात देण्यासाठी परिवर्तनाच्या लढाईला पाठबळ द्या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. पेठवडगाव येथे विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे प्रचार सभा झाली. यावेळी आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदचे अर्थ सभापती प्रवीण यादव, विजयसिंह माने, आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, महाडिकांचे अर्थकारण ‘गोकुळ’वर अवलंबून आहे. यामुळे कधीही रस्त्यावर न दिसणारे महाडिक गावोगावी फिरत आहेत. स्वत:च्या नावावर टँकर, जावयांच्या नावावर एजन्सी, वासांचे दूध व पशुखाद्यावर मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
आमदार राजू आवळे म्हणाले, जिल्ह्याची संस्था जिल्ह्यात राहिली आहे. मल्टिस्टेट झाले असते तर पश्चात्ताप करण्याची वेळ आली असती. यामध्ये कर्नाटक, इस्लामपूरचे मतदार वाढले असते. त्यामुळे सभासदांना किंमत मिळाली नसती. एकदा बदल घडविण्याची गरज आहे. सहकाराला प्रतिष्ठा देण्यासाठी एकवेळ संधी द्यावी तसेच मिणचेकर यांच्या रूपाने अठरा वर्षांनी तालुक्याला संधी मिळाली आहे. पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहतील. तसेच महाआघाडी म्हणून यापुढे एकत्र राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मुरलीधर जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, नावेद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, रणजित पाटील, विद्याधर गुरबे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, महाबळेश्वर चौगुले, किसनबापू चौगुले, बायजी शेळके, अभिजीत तायशेट्ये, सुश्मिता पाटील, रंजना रेडेकर, अभिजीत माने, शिरोली सरपंच शशिकांत खवरे, सचिन चव्हाण, चेतन चव्हाण उपस्थित होते.
चौकट : तर कर्नाटकच्या सभासदांच्या जोरावर मलिदा खाणारेच मालक झाले असते
दूध उत्पादकांसाठीच्या लढाईत मल्टीस्टेटला विरोध करून या परिवर्तन लढाईची सुरुवात सभासदांना घेऊन केली आहे. सभासदांनी साथ दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे अन्यथा कर्नाटकातील सभासदांच्या जोरावर मलिदा खाणारेच मालक झाले असते. ही लढाई सत्तेसाठी नसून, दूध उत्पादकांना जादा दर देण्यासाठीची आहे. यामुळे आम्ही सर्वपक्षीय एकत्र आलो आहोत, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने यांचे सुपुत्र अभिजीत माने हे राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे प्रचार सभेत उपस्थित होते.