कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणामुळे अखेरची घटका मोजत असताना कोल्हापूरचे वैभव समजल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाची वाटचाल आता पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू आहे. रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी, ब्लू ग्रीन वनस्पती आणि तलावामध्ये धुतले जाणारे कपडे, जनावरे हेही प्रदूषणाला कारणीभूत घटक आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.सध्या रंकाळा तलावाच्या पाण्यावर हिरवट तवंग आला आहे. हा तवंग ‘ब्लू ग्रीन अल्गी’ या वनस्पतीमुळे आला आहे. त्याचबरोबर पाण्यालाही गेल्या दोन-तीन दिवसांपासून दुर्गंधी आली आहे. हा दर्प या परिसरात पसरला आहे. तसेच तलावाच्या सभोवतालमधून मिसळणारे सांडपाणी, तलावात धुतली जाणारी जनावरे व कपडे हेही घटक रंकाळ्याच्या प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे नागरिकांनी सांगितले.आवाहनाकडे दुर्लक्षमहापालिका प्रशासनाने रंकाळा तलावात कोणीही कपडे, जनावरे धुऊ नयेत, असे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते; पण या आवाहनाला न जुमानता नागरिक रंकाळा तलावात आजही कपडे व जनावरे राजरोसपणे धुवत असल्याचे चित्र दिसते.महापालिकेचा दावारंकाळा तलावात परिसरातील सांडपाणी मिसळू नये यासाठी रंकाळा तांबट कमान ते दुधाळी नाल्यापर्यंंत ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सांडपाणी या ड्रेनेज लाईनमधून जाते. रंकाळा तलावात अतिशय कमी सांडपाणी मिसळत असल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी योजनेमधून गतवर्षी रंकाळा संवर्धन योजनेसाठी ६५ कोटी रुपयांचा निधी आला. त्यामधून रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाण्याचे नाले वळविले. हे सांडपाणी ड्रेनेज लाईनमध्ये सोडण्यात आले. त्यासाठी यामधील निधी खर्च केला. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात निधी मिळण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावित निधीमधून संपूर्ण रंकाळा तलावामधील गाळ काढण्याची प्रक्रिया होणार आहे.- आर. के.पाटील, अभियंता, पर्यावरण प्रमुख, महापालिका
रंकाळ्याच्या पाण्यावर दाट हिरवा तवंग; उग्र दर्प
By admin | Updated: March 11, 2015 00:31 IST